Join us

Amba Farming : मधमाशीच्या सहाय्याने सेंद्रिय पद्धतीने पिकवला केसर आंबा, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 21:24 IST

Amba Farming : नैसर्गिक व अवीट गोडीच्या या आंब्याची ‘मधुर’ चव अर्थातच लज्जतदार आहे हे वेगळे सांगायला नको.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) आवारात संपूर्णपणे सेंद्रिय  पद्धतीने वाढवलेला आंबा (Amba Sheti) येत्या सोमवार २ जून पासून सर्वसामान्यांसाठी वाजवी दरात उपलब्ध केला जात आहे. या आंब्याचे जतन व संवर्धन करतांना सेंद्रिय खतांसोबत परागीभवनासाठी मधमाशींचा खुबीने वापर केला आहे. त्यामुळे यंदा आंबा उत्पादनात (Mango Production) वाढ झाली. नैसर्गिक व अवीट गोडीच्या या आंब्याची ‘मधुर’ चव अर्थातच लज्जतदार आहे हे वेगळे सांगायला नको.

मुक्त विद्यापीठ आवारात सन १९९६ सालापासून संपूर्णपणे केशर आंब्याची (Keshar Amba) खास बाग आहे. सन २००० च्या आसपास रत्ना व सिंधू या हापूस आंब्याच्या उपजातींच्या रोपांची विद्यापीठ आवारात लागवड करण्यात आली. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने गांडूळखत व कंपोस्ट खतांचा वापर केल्यामुळे ही झाडे चांगल्या पद्धतीने मोठी झाली, फुलली – मोहोरली आणि फळे देखील चांगली आली. 

या आंब्याच्या चवीची ख्याती केवळ विद्यापीठ अधिकारी - कर्मचारी यांच्यापुरतीच मर्यादित राहिली नाही तर दूरवर पसरली. त्यामुळे नाशिकच्या पंचक्रोशीसह दूरवरून सर्वसामान्य जनता दरवर्षी आवर्जून खास आंबा खरेदीसाठी विद्यापीठात येते. मध्यंतरी काही वर्षे अवकाळी पाऊस व वादळवाऱ्यामुळे या आंबा पिकांचे नुकसान व उत्पादन कमी झालेले होते. पर्याय म्हणून विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने संशोधनात्मक प्रयोग कम उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यानुसार केशर बागेचे नुतनीकरण (रेजुनीवेशन – Rejunivation) करण्यात आले.

तसेच गेली काही वर्षे आंब्याचा फुलोरा असतानाच अवकाळी पाउस येत होता. त्यावर उपाय म्हणून मधमाशींचा वापर करण्यात आला. कोथी (ट्रायगोना) नावाची मधमाशी आंब्याच्या परागीभवनासाठी ‘बेस्ट आर्किटेक्ट’ असल्याचे लक्षात आले. त्यामुळे यंदा आमराई मध्ये कोथी (ट्रायगोना) व ‘सातेरी’ नावाच्या मधमाशांच्या पेट्या ठेवण्यात आल्या. परिणामी मोहोर आल्यावर परागीभवन व बळकटीकरणाचे काम चोख झाले. 

अवकाळी पाउस व वादळ वारा येवूनही आमराईतील फुलोरा आणि नंतर फळही मोठ्या प्रमाणात शाबूत राहिले. विद्यापीठात आंबा उत्पादनसंबंधी शेतकरी वर्गास सातत्याने मार्गदर्शन, प्रशिक्षण देत आंबा रोपांची विक्री देखील केली जाते. याच झाडांपासून विद्यापीठाने यावर्षी आंब्याची जवळपास ५० हजार कलमी रोपे तयार केली तरी देखील उत्पादनात वाढ झाली. 

दरवर्षीच्या सरासरीच्या १५ ते २० टनच्या तुलनेत यंदा हे उत्पादन २५ ते ३० टन होण्याचा अंदाज आहे. अधिक माहितीसाठी ७३८५२७२४०९ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि या मधुर आंब्याचा नाशिक शहर व पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठ प्रशासन व कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आलेले आहे.

टॅग्स :आंबाशेती क्षेत्रशेतीकृषी योजना