Join us

कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' ची संजीवनी

By बिभिषण बागल | Published: July 23, 2023 2:30 PM

शेतीचा प्रपंच कायम अथक कष्टाचा, अतोनात संकटांचा राहिला आहे. बळीराजाच्या पदरी सुखासुखी काहीही पडत नाही. रक्तांचं पाणी करूनही शेतमालाला हक्काचा भाव मिळत नाही. या वहिवाटीत नवं तरूणाईने आपल्या बुद्धीमत्ता व कौशल्याच्या बळावर जो पराक्रम जगासमोर आणला आहे, त्याकडे बघता होणाऱ्या ग्रामीण परिवर्तनाचे चित्र बदलू शकते.

शेती आणि निसर्ग या दोन्ही संस्था श्वाश्वत आहेत. शेतीत मानवी कार्य असले तरी शेतीची सगळी सूत्रे निसर्गाकडे अबाधित आहेत, अशी आजवरची बळीराजाची धारणा हळूहळू बदलत चालली आहे. शेतीला निसर्ग नियंत्रित करतो या परंपरागत विचारात आता मोठा बदल आलेला आहे. गेल्या काही वर्षापासून शेती स्वतःची ओळख जगाला सांगत आहे.याची जाणिव बाधांवर गेलेल्या भूमीपूत्रांना झालेली आहे. शेती बोलत आहे, तीला स्वतंत्र ओळख आहे, या भूमिकेतून बळीराजा व्यवस्थेची कूस बदलण्यासाठी स्वतःला सिद्ध करीत आहे. शेतकरी राजाचा"शेती हा धर्म" आहे. परंतू आता शेती हा 'उद्योग' असला पाहिजे, अशी गरज निर्माण झाली आहे.

शेतीधर्मात पावित्र्य आहे, मात्र जगाचा व्यवहार लक्षात घेता आधुनिक कृषी व्यवस्थेत शेतकऱ्यांनी  स्वतःला सक्षम केले पाहिजे. जो शेतमाल पिकविला तो बाजारात विकला, हा विचार मागे सारून बाजाराच्या मागणीनूसार शेतमालाचे उत्पादन घेणे, हा कृषीक्षेत्रातील महत्वाचा टप्पा म्हणता येईल. जग बदलत आहे, तर शेती मागे कशी राहू शकते? शेतीला बदललं पाहिजे, हा विचार नवतरूणाई करीत असून त्यादृष्टीने उद्योगाकडे वाटचाल सुरू झाली आहे. कृषी क्षेत्रात नव्याने जाहिर झालेल्या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण बदल घडत आहेत.

शेतीचा प्रपंच कायम अथक कष्टाचा, अतोनात संकटांचा राहिला आहे. बळीराजाच्या पदरी सुखासुखी काहीही पडत नाही. रक्तांचं पाणी करूनही शेतमालाला हक्काचा भाव मिळत नाही. या वहिवाटीत नवं तरूणाईने आपल्या बुद्धीमत्ता व कौशल्याच्या बळावर जो पराक्रम जगासमोर आणला आहे, त्याकडे बघता होणाऱ्या ग्रामीण परिवर्तनाचे चित्र बदलू शकते.

बांधावरचा शेतकरी असंघटित आहे. देशातील 80 टक्क्याहून जास्त शेतकरी बांधव अल्पभूधारक आहेत. अनेक गोष्टींच्या मर्यांदा शेती विकासाला कुंपण घालत आल्या आहेत. अश्या सगळ्या समस्येने ग्रासलेल्या परिस्थितीत जागतिकीकरणाने सर्व क्षेत्राला एक महत्वपूर्ण गोष्ट शिकविली, 'साथी हात बढाना...एक अकेला थक जायेंगा, मिलकर बोझ उठाना.... यापुढील वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य कल्पना ठरणार आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाच्या उत्पादनासाठी संघटित होऊन जोमाने कामाला लागले पाहिजे. शेतीपुढे नेण्याच्या विचारप्रवाहाचे 'अमृतमंथन' सुरू असून कोविड-19 च्या आपत्तीने जगाला भानावर आणले आहे. कृषी क्षेत्राने या संकटाशी दोन हात केले आहे. सर्व महत्वाच्या निर्णयात कृषीक्षेत्र केंद्रस्थानी असले तरी शेतकऱ्यांचा बांधा मात्र अस्वस्थ आहे. या वास्तवाकडे सर्व जबाबदार घटकांचे लक्ष वेधण्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे.

शेतकरी जगासोबत चालण्याची तयारी करीत आहे. केंद्र शासनाने 'वन नेशन-वन मार्केट'ची घोषणा केली. शेतीतून आवाज आला, 'ग्लोबल मार्केट'! आपल्या देशातील शेतकरी जागतिक बाजारपेठांकडे डोळे लावून बसले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 'ग्लोबल मार्केटिंगची'दृष्टी कृषी क्षेत्रातल्या नामवंत डोळस नेतृत्वाने दिली. नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष श्री. विलासराव शिंदे यांनी द्राक्ष उत्पादकांसाठी जो 'जागतिक बाजारपेठांचा मळा' फुलविला, त्यातून राज्यातील शेतमाल उत्पादकांना नवचैतन्याचा कैफ चढला, तर आपण भाग्यवान ठरू!

कृषीव्य वसायासाठी आज राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे. शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्यांची व घटकांची मूल्यसाखळी यापुढे अधिक मजबूत होण्याची आवश्यक्ता आहे. राज्यात अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या अस्तित्वात येत आहेत. ही प्रगतीपथाची चुणूक असली तरी या दिशेने अधिक विकेंद्रीकरण झाले पाहिजे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्यामागे शेतकरी संघटित होणे ही सामान्य वाटणारी पार्श्वभूमी असली तरी बळीराजाच्या जीवनाची घडी सुव्यवस्थित करण्याची ही सुरूवात आहे.

देशांतर्गत आणि विदेशात शेतमालाची शेतकऱ्यांकडून विक्री होणे, ही आजवर एक अवघड, किचकट, तांत्रिक प्रक्रीया समजल्या गेली होती. मात्र कोविडच्या संकटाने समाज आणि शेतकरी यांच्या परंपरागत कल्पनाच बदलून टाकल्या आहेत. या संकटात शेतकऱ्यांनी शेतमाल थेट ग्राहकांच्या दारी विकून बाजाराला ताब्यात घेण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकास आणि परिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. बळीराजाच्या सर्वांग सुंदर विकासासाठी प्रयत्नशील शासनाची जागतिक बँकेच्या सहाय्याने कृषी व उपजीविका क्षेत्रातील  'स्मार्ट' प्रकल्प कृषी व्यवसाय व उद्योग निमिर्ती करणे, जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे, तसेच पिकांची उत्पादकता वाढविणे व हवामानाच्या बदलानूसार जोखिम व्यवस्थापन करणे या ध्येयामुळे बळीराजाच्या शेतीसाठी स्मार्ट प्रकल्प नवसंजीवनी ठरू शकते.

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणारी व्यवस्था आहे. मूल्यसाखळीचा विकास केल्यामुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत जाते. या प्रक्रियेत शेतमालाच्या किंमतीत वाढ होतांना दिसते. मूल्यसाखळीचा विकास केल्याने ग्राहकाने अदा केलेल्या रूपयामध्ये उत्पादकाचा हिस्सा वाढतो. मूल्यसाखळीत सहभागी असलेल्या घटकांची कार्यक्षमता वाढून घटकांमध्ये समन्वय आणि विश्वासाचे वातावरण तयार होते. त्यामुळे मूल्यसाखळी स्पर्धात्मक बनते.

स्मार्टमूळे शेतकरी संघटित होऊन खरेदीदारांशी थेट जोडले जाणार आहेत. प्रक्रीया उद्योग, निर्यांतदार, संघटित किरकोळ विक्रेते यांना सोबत घेण्याची ही अलैकीक समन्वय पद्धत ठरणार आहे. स्मार्टच्या कार्यातून संपूर्ण मूल्यसाखळीतील सर्व घटकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. स्मार्टचे खालील लाभार्थी शेतकरी संस्था आहेत.

  • समुदाय आधारीत नोंदणीकृत संस्था (CBO)
  • शेतकरी उत्पादक कंपनी (FPC)
  • लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) महिला बचत गटाचे संघ
  • प्रभाग संघ (Clf) महिला बचत गटाचे संघ
  • प्राथमिक कृषी सहकारी संस्था (PACS)
  • उत्पादक संघ (Growers Association Federation)
  • आत्मा यंत्रणेकडे नोंदणी झालेले उत्पादक गट (PG)
  • व्हीएसटीएफ गावसमुह इत्यादी.

स्मार्टच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संघटित असणे, ही प्रमुख अट आहे. बळीराजाचे संघटन पुढील प्रवासात महत्वपूर्ण ठरणार आहे. स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची यंत्रणा सक्षम असून कृषी विभागासह, पशुसंवर्धन, पणन, सहकार, महिला व बालकल्याण, ग्रामविकास व नगरविकास विभागाचा उत्तम सहभाग या प्रकल्पात दिसून येतो. स्मार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी सहाय्य केले जाणार आहे. औजारे, उपकरणे, गोदाम, काढणी पश्चात पायाभूत सुविधांसाठी आर्थिक व तांत्रिक मदत केली जाणार आहे. या प्रकल्पाचे काही उपप्रकल्प असून बाजार संपर्कवाढ उपप्रकल्प किंवा धान्य गोदाम आधारित उपप्रकल्पातून धान्य साठवणूक व साठवणूक पश्चात धान्य तारणाबाबतचे कार्य या उपक्रमांतर्गत  होणार आहे तसेच ग्रामपातळीवर गोदाम साठवणूक सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

स्मार्टअंतर्गत मूल्यसाखळी विकासशाळा ही नविन संकल्पना राबविण्यात येत असून मूल्यसाखळीतील सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणून इतर घटकांची संबंधित पिकासंबंधित आव्हाने आणि मुद्दे  समजून घेणे या उद्देशाने मूल्यसाखळी विकास शाळेची (व्हीसीडीएस) संकल्पना पुढे आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनासंदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कृषी आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. कृषी विपणन सेवा कक्षाच्या माध्यमातून जागतिक व देशांतर्गत लागवड क्षेत्र, संभाव्य उत्पादन साठवणूक, मागणी व बाजारभाव या माहितीचे विश्लेषण करून प्रमुख पिकांच्या संभाव्य बाजारभावांचे अंदाज अहवालाचे प्रसारण करणे, लागवडीच्या वेळेस बाजारभावाच्या अंदाजानूसार आगामी हंगामात कोणती पिके घ्यावीत याचे मार्गदर्शन केले जात आहे  तसेच काढणीच्या वेळेस बाजारभावाच्या अंदाजानूसार शेतमाल विक्री करावा अथवा गोदामात साठवणूक करावी याचे दिशादर्शन केले जाते. यासोबतच बाजारभावाच्या अंदाजाचे प्रसारण, मोबाईल संदेश, वेबसाईट, कार्यशाळा, माहितीपुस्तिका, प्रदर्शने या माध्यमातून 'स्मार्ट प्रकल्प' शेतकरी राजापर्यंत पोहचत आहे. यापुढील काळात 'स्मार्ट प्रकल्प' कृषी व्यवसायासाठी नवसंजीवनी ठरणार आहे, हे निश्चित!

डॉ. प्रीती सवाईरामpreetis2015@yahoo.com 

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रशेतकरीव्यवसायपीकपीक व्यवस्थापनविलासराव शिंदेसरकारसरकारी योजना