Join us

Pik Vima: शेतकरी बांधवांनो, पीक विमा काढताना ही छोटीसी चूक ठरेल त्रासदायक, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:37 IST

सध्या पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग आहे. अनेकांनी अजूनही प्रधानमंत्री पीक विमा काढलेला नाही. पीक विमा काढताना काळजी घेणे आवश्यक असते. छोटीशी चूकही त्रासदायक ठरू शकते. कोणती? ते जाणून घेऊ

उमरखेड : आधार कार्ड, बँक खाते व सातबाऱ्यावरील नावात किरकोळ जरी बदल असेल तरी पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, असा मेसेज व्हॉट्सॲपद्वारे फिरत आहे. मात्र, अशा किरकोळ फरकामुळे शेतकरी वंचित राहणार नाही, असे स्पष्टीकरण तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकार यांनी केले आहे.

ते म्हणाले की, आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात. परंतु सातबाऱ्यावर कधी-कधी नावात किरकोळ बदल असतो. नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही. परंतु, पूर्ण नाव, आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही. नावात असलेला बदल विमा कंपनीमार्फत तपासला जाईल आणि तपासणीअंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जावू नये. मात्र, शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा घ्यावा. विमा घेतलेले पीक प्रत्यक्षात शेतात आढळले नाही तर विमा अर्ज नामंजूर होईल. शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी शक्यतो ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करावी. २ जुलैपर्यंत सुमारे ५७ लाख विमा अर्ज प्राप्त झाले आहेत.

खरीप हंगामात विमा घेण्यासाठीचा अंतिम दि. १५ जुलै आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा तातडीने उतरवून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा आठ अद्ययावत उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे, असे तालुका कृषी अधिकारी गंगाधर बळवंतकार यांनी सांगितले.

टॅग्स :पीक विमाशेतकरीशेती