Join us

Soybean Pik : सोयाबीन पिकांवर संकट; 'ही' फवारणी ठरत आहे रामबाण उपाय वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:10 IST

Soybean Pik : खरीप हंगामात सोयाबीन पीक अंकुरले असले तरी पावसाने दडी मारल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. अशा वेळी रासायनिक औषधांऐवजी स्वस्त, सेंद्रिय आणि पर्यावरणस्नेही फवारणी हा शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरत आहे. वाचा सविस्तर (Soybean Pik)

Soybean Pik : खरीप हंगामात सोयाबीनपीक अंकुरले असले तरी पावसाने दडी मारल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. अशा वेळी रासायनिक औषधांऐवजी स्वस्त, सेंद्रिय आणि पर्यावरणस्नेही ५% निंबोळी अर्काची फवारणी हा शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरत आहे.(Soybean Pik)

खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी जोरात सुरू आहे. मात्र काही भागांमध्ये पावसाने अचानक विश्रांती घेतल्यामुळे पिकांवर ताण वाढला असून, कीड व रोगांचा धोकाही वाढला आहे. (Soybean Pik)

यावर मात करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी हा एक प्रभावी आणि नैसर्गिक पर्याय ठरत आहे. कृषी विभाग व 'आत्मा' संस्थेच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना यासाठी मार्गदर्शन केले आहे.(Soybean Pik)

सोयाबीनची स्थिती; पाऊस थांबताच कीड-रोगांचा धोका

राज्यात जून अखेरपर्यंत मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. काही भागांत पाऊस चांगला झाल्याने पीक अंकुरले असले तरी, नंतरच्या पावसाच्या खंडामुळे कोवळ्या पिकांवर कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

निंबोळी अर्काचा वापर; नैसर्गिक व सेंद्रिय कीड नियंत्रण उपाय

५% निंबोळी अर्क हा कीड व रोग नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त, सेंद्रिय, आणि पर्यावरणस्नेही उपाय आहे. यामुळे पिकांवरील अळी, थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यासारख्या कीटकांचे नियंत्रण शक्य होते.

निंबोळी अर्क तयार करण्याची प्रक्रिया

५ किलो निंबोळी बारीक करून १० लिटर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा

दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून त्यात ९० लिटर पाणी मिसळा

त्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा घालून चांगलं ढवळा

तयार झालेलं १०० लिटर द्रावण एक एकर पिकासाठी पुरेसे ठरतं

निंबोळी अर्काचे फायदे

किडींच्या जीवनचक्रात व्यत्यय आणून प्रजनन क्षमता रोखतो

सेंद्रिय व सुरक्षित असल्याने जमिनीच्या पोतात सुधारणा 

फायदेशीर सूक्ष्मजीवांचे संवर्धन

रासायनिक औषधांपेक्षा स्वस्त, सोपं आणि प्रभावी

पिकांची प्रत आणि उत्पादनक्षमतेत वाढ

सेंद्रिय कीडनाशकांचे महत्त्व

'आत्मा'चे तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी सांगितलं की, रासायनिक औषधांचा अतिवापर मातीच्या गुणवत्तेला बाधा पोहोचवत आहे. त्याऐवजी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, तंबाखू अर्क हे सेंद्रिय उपाय अधिक सुरक्षित आणि दीर्घकालीन फायदे देणारे आहेत.

* दशपर्णी अर्क – रोगप्रतिबंधक क्षमता वाढवतो

* तंबाखू अर्क – पाने खाणाऱ्या किडींसाठी प्रभावी

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* कोवळ्या पिकांवर कीड-रोग दिसताच ५% निंबोळी अर्काची फवारणी तात्काळ करावी

* फवारणी सकाळी वा संध्याकाळी करावी

* अति पाऊस किंवा सुकाळ अशा दोन्ही स्थितींमध्ये नैसर्गिक उपाय उपयुक्त

* शेतमित्र, कृषी सहाय्यक वा 'आत्मा' केंद्राशी सल्लामसलत करून सेंद्रिय उपाय राबवावेत

निसर्गपूरक शेती आणि उत्पादनाची टिकाऊ गुणवत्ता हवी असल्यास सेंद्रिय उपाय हेच उत्तम. निंबोळी अर्कासारखे स्वस्त आणि प्रभावी उपाय सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील.

सोयाबीनची पेरणी अनेक भागात झाली आहे. अनेक ठिकाणी पीक अंकुरले असताना पावसाने दडी मारल्यामुळे कोवळ्या पिकास कीड रोगाचा धोका लागून आहे. अशा स्थितीत नुकसान टाळण्यासाठी निंबोळी अर्क फायदेशीर ठरू शकते. - जयप्रकाश लव्हाळे,  'आत्मा' तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक

हे ही वाचा सविस्तर : Herbicide Spray: तण नियंत्रणाची योग्य वेळ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनपीकपीक व्यवस्थापनखरीप