Bhuimung Kadhani :भुईमुगाच्या काढणीच्यावेळी (Bhuimug Kadhani) जमिनीत थोडी ओल असल्यास काढणीचे काम सोपे होते. शक्यतो काढणीच्या काळात ऊन भरपूर असल्यास काढणीचे काम चांगले होते. पुढे चांगले ऊन मिळेल म्हणून काढणीस उशीर केला तर उपट्या जातीतील शेंगाच्या (Groundnut Harvest) दाण्यांना आतल्या आत मोड येऊ शकतात. पुढे अधिकच उशीर केला तर शेंगांना मोड फुटतात व मोठे नुकसान संभवते.
काढणी अगोदर शेंगा पक्व होऊन गेल्या असतील तर दाणे काळे पडतात व उत्पादनाची (Bhuimug Production) प्रत खालावून बाजारभाव कमी मिळतो. काढणी लवकर केल्यास शेंगांमध्ये अपक्व दाण्याचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळे उत्पादन कमी येते, उत्पादनाची प्रत घटते, शेंगातील दाण्यात तेलाचे प्रमाण कमी राहते. खूपच उशिरा काढणी केल्यास जमीन टणक होऊन पुष्कळच्या शेंगा जमिनीतच राहतात. त्या खणून काढाव्या लागल्याने काढणीचा खर्च वाढतो.
त्याकरिता भुईमुगाची काढणी योग्य वेळीच करणे गरजेचे असते. भुईमुगाचे पीक काढणीस तयार झाले किंवा नाही, हे पाहण्याकरिता शेतातील ठिकठिकाणची काही झाडे उपटून शेंगा पक्व झाल्या की नाही हे पाहावे. जेव्हा ढाळ्यास पक्व शेंगाचे प्रमाण जास्त आहे असे दिसून येईल, ती वेळ काढणीस योग्य आहे, असे समजावे. यावेळी भुईमुगाची पाने पिवळी होऊन गळू लागतात.
शेंगाची जेव्हा पूर्ण वाढ झालेली असते तेव्हा शेंगाच्या टरफलाची आतली बाजू काळसर दिसू लागते. शेंगातील दाणा पूर्णपणे भरलेला असल्यास व त्यावर रंग आलेला असल्यास शेंगा पूर्ण पक्व झाल्याचे समजण्यास हरकत नाही. पूर्णपणे पक्व झालेली शेंग हाताच्या बोटाने दाबली असता ती लवकर फुटत नाही. यावरून भुईमुगाचे पीक काढणीस आले की नाही हे ठरविता येते.
उपट्या जातीचे वेल उभट वाढतात. त्यामुळे ते उपटून घेऊन हाताने शेंगा तोडून काढाव्यात. पस-या जातीचे वेल लहान कुळवावर उभे राहून फिरवून गोळा करावेत. नंतर जमिनीत असलेल्या शेंगा खोल कुळव चालवून किंवा खुरप्याने चाळण करून किंवा लाकडी नांगराच्या साह्याने नांगरून काढाव्यात. वेलाच्या शेंगा काढल्यावर त्या खळ्यावर ७ ते ८ दिवस चांगल्या वाळवाव्यात.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ