नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी काही शेतकरी पर्यायी व्यवस्था करतात आणि संभाव्य नुकसानीपासून स्वतःची सुटका करून घेतात. शेतकरी यशवंत महात्मा माने त्यापैकीच एक.
श्री. माने यांचे गाव द. सोलापूर तालुक्यातील कंदलगाव असून 2 हेक्टर बागायत जमीन ते कसतात. एकूण जमिनीपैकी 1.20 हे. क्षेत्रावर मागील 10 वर्षापासून ते खरीप व रब्बी हंगामात ऊस आणि कांदा लागवड करतात. कांदा लागवड करुन उत्कृष्ट उत्पादन त्यांना मिळते.
मात्र, गेल्या काही वर्षापासून अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा काढल्यानंतर बाजारामध्ये दर फारच कमी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागले. कांदा साठवणूक करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने नाइलाजाने मिळेल त्या दराने त्यांना कांदा विकावा लागत होता. बाजारातील कमी दर व उत्पादन खर्च वाढल्याने कांदा लागवड करणे परवडत नव्हते.
असे मिळाले अनुदानयाबाबत यशवंत माने म्हणाले, कांदाचाळ मंजुरी मिळाल्यानंतर आठ महिन्यांपूर्वी 25 मेट्रिक टन कांदाचाळ मी तयार केली आहे. त्यासाठी एकूण 2 लाख 12 हजार खर्च आला असून मला 87 हजार 500 रू. अनुदान मिळाले. खरीप व रब्बी हंगामामध्ये 1.50 हे कांदा लागवड केली असून 38 टन कांद्याची मी कांदाचाळमध्ये साठवणूक केली.
बाजारभावाच्या ओढाताणीतही मिळवला २२००रुपयांचा दरसन 2022-23 मध्ये सततचा पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे बाजारभावात कांद्याचे दर सारखे खाली-वर होत असून 2200 रु. प्रति क्विंटल एवढ्या चढ्या दराने 25 मेट्रिक टन कांदा मी विकलेला आहे. माझ्या घरी वडील, भाऊ व आमच्या दोघांच्या कुटुंबातील 12 सदस्य आहोत. आमची मुलं शिक्षण घेत असून, कांदा चाळीतून मिळालेला नफा आमच्या कुटुंबासाठी पूरक उत्पन्न ठरले आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन
सदर कांदा चाळीस तालुका कृषि अधिकारी रामचंद्र माळी, मंडळ कृषि अधिकारी के. एम. लादे व कृषि सहाय्यक अशोक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. कांदा साठवणूक करण्यासाठी कांदाचाळ हे अत्यंत उपयोगी व फायदेशीर योजना आहे. कांदाचाळ उभारण्यासाठी कृषि विभागातील अधिकारी व सदर कांदा चाळीस तालुका कृषि कर्मचारी यांचे मार्गदर्शन व मदत श्री. माने यांना मिळाली. यासाठी यशवंत माने त्यांचे आभार व्यक्त करतात.