Join us

Gogalgai Niyantran : गोगलगायीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे ५ उपाय; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:47 IST

Gogalgai Niyantran : गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व रोपावस्थेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे पीक संपूर्ण नष्ट होते.

गोगलगाय ही बहूभक्षी किड असून ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे अधाशासारखे पाने खाऊन अतोनात नुकसान करते. निशाचर असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या गोगलगायी रोपांची पाने खातात व शेताचे नुकसान होते.

गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व रोपावस्थेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे पीक संपूर्ण नष्ट होते.

गोगलगायी नियंत्रणासाठी करा हे उपाय

  1. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आतमध्येच मरून जातील.
  2. गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच करणे गरजेचे आहे.
  3. शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.
  4. लहान शंखीच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची (१०० ग्रॅम प्रति १ लिटर पाणी) फवारणी फायदेशीर दिसून आली आहे.
  5. बोर्डो मिश्रण (१ किलो मोरचूद १ किलो चुना + १०० लिटर पाण्यात), कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद (३०० ग्रॅम १० लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम १० लिटर पाण्यात) इत्यादीच्या फवारण्या गोगलगाय नियंत्रणासाठी नोंदणीकृत नाहीत, परंतु गोगलगाय नियंत्रणासाठी किंवा त्यांना अटकाव करण्यासाठी फळबागेत काही प्रमाणात परिणामकारक आहेत.

अशाप्रकारे शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वरीलप्रमाणे उपाययोजना पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच केल्यास गोगलगायीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे होते.

अधिक वाचा: औषधं व खतांवरील खर्च कमी करण्यासाठी वापरा ही आठ संवर्धके; वाचा सविस्तर

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणशेतकरीशेतीपीक