Market yard :
दत्ता मोरस्कर
वासडी : कन्नड तालुक्यातील वासडी व परिसरात यंदा तुरीचे पीक चांगलेच बहरले असून या भागातील शेतकरी तुरीच्या हिरव्या शेंगा ४५ रुपये प्रती किलोने छत्रपती संभाजीनगर, कन्नड, जळगाव, सुरत येथील खुल्या बाजारात विकून उत्पन्न मिळवत आहेत.
वासडी व परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली आहे. याचा फायदा पिकांना होताना दिसून येत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात तुरीचा पेरा केला आहे. काही शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून तर काही शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणून तुरीची पेरणी केली आहे.
या शेतकऱ्यांना मिळतोय फायदा
रामनगर येथील शेतकरी शांताराम शेळके यांनी एक एकरवर हे पीक घेतले आहे. तर दुसरे शेतकरी सोपान लोंढे यांनीही एक एकर क्षेत्रावर तुरीची लागवड केली आहे. हे पीक सहा महिन्यांचे असून त्याला पाणी कमी लागते.
या पिकाला फुले लागल्यापासून २ ते ३ फवारण्या आवश्यक असतात. शेतकरी शांताराम शेळके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कृषीविद्यापीठाच्या केंद्रातून आणलेल्या बीडीएन ७११ या जातीच्या बियाण्याची लागवड केली आहे. अमोल भुसारे यांनी दोन एकर, शांताराम शेळके यांनी अर्धा एकर तर संजय गायकवाड यांनी एक एकर तुरीची लागवड केली आहे.
१० क्विंटल शेंगांची केली विक्री
• खातखेडा येथील शेतकरी बाळासाहेब उत्तमराव पवार यांनी २० गुंठ्यात पेरणी केलेल्या तुरीच्या १० क्विंटल शेंगाची विक्री केली.
• पवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर, कन्नड, जळगाव, सुरत येथील बाजारपेठेत शेंगांची विक्री करीत असल्याचे सांगितले.
सुरुवातीला होता ७० रुपये किलो दर
• शेतकऱ्यांनी तुरीची रास करून तूर विक्रीची वाट न पाहता हिरव्या रंगाच्या शेंगाच शहरातील खुल्या बाजारात विक्रीसाठी आणण्यास सुरूवात केली आहे. सध्या या शेंगांना प्रतिकिलो ४५ रुपयांचा दर मिळत आहे. या अगोदर ७० रुपयांपर्यंतचा देखील दर मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.