Soybean Market : हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीने पिके उध्वस्त झाली, आणि आता बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या मनमानीने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. (Soybean Market)
शासनाने जाहीर केलेला ५ हजार ३२८ रु. हमीभाव कागदावरच राहिला असून, खुल्या बाजारात दर तब्बल १ हजार ५०० रुपयांनी कमी मिळत आहेत. (Soybean Market)
दिवाळीचा खर्च आणि रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना आपला माल मातीमोल भावात विकावा लागत आहे.(Soybean Market)
एकीकडे अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान, तर दुसरीकडे शासकीय खरेदी केंद्रांचा अभाव आणि बाजारपेठेतील मनमानी या दोन्ही गोष्टींनी शेतकऱ्यांच्या अडचणींना परमोच्च बिंदू गाठला आहे. (Soybean Market)
दिवाळीचा खर्च आणि रब्बी हंगामाची पेरणी यासाठी निधी उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना आपला माल हमीभावापेक्षा कमी दराने विकावा लागत आहे.
निसर्ग आणि बाजार दोघांचेही संकट
या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड झाली होती. सुरुवातीला पीक समाधानकारक दिसत होते. परंतु, काढणीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण जिल्हा झोडपला.
शेतात पाणी साचल्याने पिके कुजली, काही ठिकाणी उभ्या सोयाबीनला मोड फुटले, तर अनेक ठिकाणी काढणीच्यावेळी यंत्रे चिखलात रुतली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
हमीभाव फक्त कागदावरच
केंद्र शासनाने सोयाबीनसाठी हमीभाव ५ हजार ३२८ रु. प्रति क्विंटल जाहीर केला असला तरी अजूनही हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांचा माल कमी किमतीत खरेदी करून मोठा नफा मिळवत आहेत.
बाजारात सध्या चांगल्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार १०० रुपये तर डॅमेज सोयाबीनला फक्त २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतकेच दर मिळत आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये कमी भावात माल विकावा लागत आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश
शासनाने सोयाबीनला हमीभाव जाहीर केला, पण खरेदी केंद्रच सुरू केले नाहीत. आमचा माल व्यापाऱ्यांकडे फेकून द्यावा लागतो. सरकार आमच्या मरणाची वाट बघत आहे का? - बद्रीनाथ शिंदे, शेतकरी, सावा
अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झालं, आणि उरलेलं व्यापाऱ्यांनी मातीमोल घेतलं. या दुहेरी संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडून तातडीने मदत आणि हमीभाव खरेदी सुरू करावी. - पांडुरंग भवर, शेतकरी, जामठी
बाजारपेठेतील मनमानीला आळा घालण्याची गरज
बाजारातील व्यापाऱ्यांकडून डॅमेज माल आणि मॉइश्चर या कारणावरून भाव कमी करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यावर कोणतेही शासकीय नियंत्रण नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
स्थानिक बाजार समित्यांनी व जिल्हा प्रशासनाने सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरू करून दर स्थिर ठेवण्यासाठी पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
शेतकऱ्यांची मागणी
* तातडीने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावीत.
* अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
* बाजारातील डॅमेजच्या कारणावरून भावकपात थांबवावी.
* प्रशासनाने थेट बाजार तपासणी मोहीम राबवावी.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आज हमीभाव या शब्दावरचा विश्वास गमावत आहेत. निसर्गाच्या तडाख्यानंतर बाजारपेठेतील लुटमारीमुळे त्यांचे जगणेच कठीण झाले आहे. सरकारने यावर तातडीने ठोस पावले न उचलल्यास शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Web Summary : Hingoli farmers face double blow: crop loss from rain and low soybean prices. Government inaction on promised rates forces distress sales below support price. Farmers demand immediate relief.
Web Summary : हिंगोली के किसान दोहरी मार झेल रहे हैं: बारिश से फसल का नुकसान और सोयाबीन की कम कीमतें। सरकार की निष्क्रियता के कारण किसान समर्थन मूल्य से कम पर बेचने को मजबूर हैं। किसानों को तत्काल राहत की आवश्यकता है।