Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mirchi Market : गुंटूर बाजारात आवक घटली; लाल मिरचीचे दर आणखी वधारणार का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:39 IST

Mirchi Market : छत्रपती संभाजीनगर बाजारात लाल मिरचीचे दर वाढले असले तरी पिकांचे नुकसान, मजुरीचा वाढलेला खर्च आणि अस्थिर बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे गणित अजूनही बिघडलेले आहे. (Mirchi Market)

Mirchi Market : जेवणाची चव वाढवणारी लाल मिरची आता शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठीही चर्चेचा विषय ठरली आहे. (Mirchi Market)

ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच लागवड घटल्याने उत्पादनात मोठी घट झाली असून, बाजारात दर वाढले आहेत. मात्र या दरवाढीचा थेट फायदा शेतकऱ्यांना कितपत होतो, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Mirchi Market)

अतिवृष्टीमुळे उत्पादन घट

दक्षिण भारतातील प्रमुख उत्पादक राज्ये तेलंगणा व आंध्र प्रदेश येथे अतिवृष्टीमुळे सुमारे ४५ ते ४६ टक्के क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळते. परिणामी प्रति हेक्टर उत्पादनात २३ ते २४ टक्क्यांनी घट झाली.

याचा परिणाम देशभरातील बाजारपेठांवर झाला असून, विशेषतः गुंटूर खम्मम आणि वारंगल या प्रमुख बाजारपेठांमध्ये मालाची आवक कमी झाली आहे. साठवणुकीतील सुमारे ८५ टक्के माल संपत आल्याने पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कमी लागवड आणि वाढता खर्च

गेल्या दोन वर्षांत समाधानकारक दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिरचीऐवजी मक्यासारख्या पिकांकडे वळणे पसंत केले. त्यामुळे यंदा मिरचीची लागवड सुमारे २० टक्क्यांनी घटली.

याशिवाय मजुरीचा खर्च वाढल्याने मिरची तोडणी व प्रक्रिया खर्चात वाढ झाली आहे. मिरची हे श्रमप्रधान पीक असल्याने तोडणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागतात. खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचा निव्वळ नफा कमी होत आहे.

दरवाढ; पण फायदा कोणाला?

शहरातील बाजारात विविध प्रकारच्या लाल मिरचीच्या दरात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत मोठी वाढ झाली आहे. तेजा, चपाटा, कश्मिरी, बेडगी अशा प्रकारांना ३० ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे.

मात्र, शेतकऱ्यांच्या मते, दरवाढ प्रामुख्याने घाऊक व किरकोळ पातळीवर दिसते; उत्पादकांना मात्र त्याचा संपूर्ण लाभ मिळत नाही.

पिकाचे नुकसान, वाढलेला खर्च आणि बाजारातील चढ-उतार यामुळे उत्पन्नात स्थिरता नसल्याची खंत ते व्यक्त करतात.

व्यापाऱ्यांनाही तोटा

दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह कमी झाला आहे. १० पैकी ७ ग्राहक वाढलेले भाव पाहून परत जात असल्याचे व्यापारी सांगतात. शिवाय, मिरचीतील ओलसरपणा कमी होत गेल्याने वजन घटते आणि व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागते.

स्थिर बाजारव्यवस्थेची गरज

मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हवामानाचा अनिश्चितपणा, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिर दर ही मोठी आव्हाने आहेत.

योग्य साठवण सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि स्थिर बाजारव्यवस्था उपलब्ध झाल्यास दरवाढीचा खरा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो.

लाल मिरचीच्या दरातील तिखट वाढ ही केवळ ग्राहकांसाठीच नव्हे तर शेतकऱ्यांसाठीही आव्हानात्मक ठरत आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध शेती आणि बाजारातील पारदर्शक व्यवस्था हीच काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

लाल मिरचीचे दर (प्रति किलो)

प्रकार१३ जानेवारी (रु.)१३ फेब्रुवारी (रु.)
लवंगी१८० ते २००१८० ते २५०
तेजा१८० ते २५०२४० ते ३००
चपाटा१८० ते २५०२५० ते ३५०
रसगुल्ला३०० ते ४००४५० ते ५००
कश्मिरी४०० ते ४५०४५० ते ५५०
बेडगी२५० ते ३००३५० ते ४५०
गुंटूर१८० ते २००२४० ते २८०

दक्षिण भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये (गुंटूर, खम्मम, वारंगल) मालाची आवक कमी आहे. त्यामुळे साठवणुकीतील ८५ टक्के माल संपत आला आहे. उन्हाळ्यात मागणी वाढणार असल्याने दर आणखी वाढतील.- स्वप्नील जैन, व्यापारी

हे ही वाचा सविस्तर : Soybean Bajar Bhav : सोयाबीनचे भाव वाढले की घसरले? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Chili Market: Guntur Arrivals Decline; Will Red Chili Prices Rise Further?

Web Summary : Red chili prices are soaring due to crop damage from excessive rain and reduced cultivation. Arrivals in major markets like Guntur have decreased. While retail prices have increased, farmers aren't fully benefiting. Experts suggest stable market systems for fair farmer gains.
टॅग्स :शेती क्षेत्रमिरचीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती