युनूस नदाफ
आंध्र प्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे पानांची आयात थांबली असून, याचा थेट फायदा स्थानिक पान उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. (Betel Leaf Market)
बाजारात पानांची आवक घटल्याने दरात तिपटीने वाढ झाली असून, गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असलेल्या पानमळ्यांना दिलासा मिळाला आहे. (Betel Leaf Market)
सध्या कोणते दर मिळत आहेत आणि हा फायदा किती काळ टिकेल, हे जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
बाजारपेठेत पानांची आवक जवळपास ठप्प झाल्याने पानांच्या दरात मोठी उसळी घेतली असून, याचा थेट फटका पान खाणाऱ्या शौकिनांना बसणार आहे. एकेकाळी स्वस्तात मिळणारे पान आता महागड्या लक्झरी वस्तूसारखे झाले असून, ओठांची लाली टिकवणे सर्वसामान्यांसाठी कठीण झाले आहे.
मात्र, या परिस्थितीचा फायदा स्थानिक पान उत्पादक शेतकऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत ४० ते ५० रुपये शेकडा दराने मिळणारे लोकल पान सध्या थेट १५० ते १७५ रुपये शेकडा दराने विकले जात आहे.
शहरातील पानटपऱ्यांवर पूर्वी ५ ते ७ रुपयांना मिळणारा पानाचा विडा आता किमान १० रुपयांपासून थेट ५०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. परिणामी, ग्राहकांची संख्या घटण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
आंध्रातील अतिवृष्टीचा फटका
जिल्हा व परिसरात प्रामुख्याने आंध्र प्रदेशातून खपुरी पानांची आवक होते. तसेच कोलकाता व इतर राज्यांतूनही पान आयात केली जाते.
मात्र, गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे पानमळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पानमळे पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याने बाहेरील राज्यातून येणारी आवक जवळपास थांबली आहे.
स्थानिक पानांना वाढती मागणी
बाहेरील पानांची आवक घटल्याने अर्धापूर तालुक्यातील चाभरा, बारड परिसरातील स्थानिक पानांना मागणी वाढली आहे. काही वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या तोट्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानमळ्यांकडे पाठ फिरवली होती. मात्र, सध्या जे मोजके शेतकरी पान उत्पादनात टिकून आहेत, त्यांना वाढीव दराचा दिलासा मिळत आहे.
मोजकेच पानमळे शिल्लक
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चाभरा गावातील बहुतांश पानमळ्यांचे नुकसान झाले असून, केवळ काही मोजकेच मळे तग धरून आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पानमळे वाचले आहेत, त्यांना सध्या वाढलेल्या दराचा फायदा होत आहे.- सतीश कल्याणकर, पान उत्पादक शेतकरी
सध्या आंध्र प्रदेशातून मर्यादित प्रमाणात कपुरी पानांची आवक सुरू असून, एका बुटीत सुमारे ३ हजार पाने असतात. या बुटीची किंमत सध्या २ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बाहेरील राज्यातून येणाऱ्या मर्यादित आवकेमुळेच पानाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. -मारोतराव नारसुने,पान विक्रेते
एकंदरीतच, पानांच्या दरातील ही वाढ पान खाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असली, तरी संकटात सापडलेल्या स्थानिक पान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती काही प्रमाणात दिलासादायक ठरत आहे.
Web Summary : Heavy rains in Andhra Pradesh disrupted betel leaf imports, benefiting local farmers. Prices tripled due to reduced supply, offering respite to struggling farms. Consumers face higher prices as a result.
Web Summary : आंध्र प्रदेश में भारी बारिश से पान के पत्तों का आयात बाधित, स्थानीय किसानों को फायदा। आपूर्ति घटने से कीमतें तीन गुना बढ़ीं, जिससे संघर्षरत खेतों को राहत मिली। नतीजतन, उपभोक्ताओं को अधिक कीमतों का सामना करना पड़ रहा है।