वर्धा : आंब्याच्या हंगामामध्ये संपूर्ण उन्हाळभर बाजारात मोठ्या प्रमाणात विविध जातींचे आंबे विक्रीसाठी (Mango Season) उपलब्ध असताना केळीने मात्र आपल्या भावाचा तोरा कायम ठेवला. जूनच्या पहिल्या आठवड्यात १ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटलने भाव मिळत आहे. केळी उत्पादक शेतकरी भाव (Keli Market) चांगला मिळत असल्याने समाधानी आहेत.
आंब्याच्या हंगामात (Amba Market) भाव पडतील अशी शेतकऱ्यांना भीती होती; परंतु मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आंबा उपलब्ध असताना केळीच्या भावावर विशेष असा परिणाम झाला नाही. केळीचे भाव समाधानकारकच राहिले. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून केळीला चांगले भाव मिळत असल्याने केळीच्या लागवड क्षेत्रातही तालुक्यात वाढ झाली आहे.
तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडूनही विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने केळी बागायतदारांची संख्या वाढत आहे. सेलू तालुक्यात दर्जेदार केळीचे उत्पादन (Keli Production) होत होते. त्यामुळे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सेलूचे नाव होते.
दरम्यान, काही वर्षे केळीला उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे बजेट विस्कटले व केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. आता पुन्हा तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, अनेक गावांत केळीच्या बागा दिसू लागल्या आहेत. त्यामुळे सेलूला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्याचे संकेत मिळू लागले आहे. दोन वर्षांत केळीच्या बागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
असे राहिले केळीचे भाव (क्विंटलमध्ये)
फेब्रुवारी महिन्यात १ हजार ५०० रुपये, मार्च महिन्यात १ हजार ६०० रुपये, एप्रिल महिन्यात १ हजार २५० रुपये, मे महिन्यात १ हजार १५० रुपये, जून महिन्यात १ हजार ६५० रुपये दर मिळत आहे.
यंदा केळीचे लागवड क्षेत्र वाढणार!मागील काही वर्षांच्या तुलनेत गेल्या दोन वर्षांत केळीच्या पिकाला चांगला भाव मिळत आहे. उत्पादन खर्चानुसार केळीचे पीक आता शेतकऱ्याला समृद्ध करीत आहे. एवढेच नव्हे, तर केळीचे व्यापारी वेळेत शेतात येऊन केळीची कटाई करीत असल्याने नुकसानही टळत आहेत. त्यामुळे यंदा नव्याने केळी लागवड करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
केळी उत्पादकांना शासकीय मदतीची अपेक्षासेलू तालुक्यात केळीच्या पिकाचे वैभव लोप पावले होते. चांगले भाव मिळत असल्याने पुन्हा गतवैभव प्राप्त होत आहे. मात्र, वादळवाऱ्यात मोठे नुकसान होते. मागील काही दिवसांत झालेल्या वादळवाऱ्याने अनेक गावांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या, अशा शेतकऱ्यांना शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.