Banana Market : शेतकरी सततच्या पावसामुळे आणि घटलेल्या बाजारभावामुळे अडचणीत सापडले आहेत. झाडावरच पिकलेले केळीचे घड विक्रीसाठी न मिळाल्याने सडत आहेत, तर अव्वल दर्जाच्या केळीला सध्या फक्त ६५० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. (Banana Market)
शेतकऱ्यांनी तातडीने मूल्य हमी योजना किंवा अनुदानाची मागणी केली आहे. सोयगाव तालुक्यातील बनो्टी, बोरमाळ तांडा, नांदगाव, किन्ही आणि परिसरातील केळी उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. (Banana Market)
एका बाजूला सततच्या पावसामुळे शेतातील केळीच्या बागा ओलसर झाल्या असून वेळेवर काढणी होत नाही, तर दुसऱ्या बाजूला बाजारातील दर कोसळल्याने उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.(Banana Market)
शेतात तयार झालेले केळीचे घड वेळेवर विक्री न झाल्याने झाडावरच पिकून सडू लागले आहेत. परिणामी, बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.(Banana Market)
बाजारभाव घसरले, खर्च वसूल होईना
सध्या अव्वल दर्जाच्या केळीला जळगाव जिल्ह्यातील रावेर बाजारात केवळ ६५० रुपये क्विंटल, तर दुय्यम दर्जाच्या केळीला फक्त ३०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. प्रत्यक्षात केळीला किमान १ हजार रुपये क्विंटल दर मिळणे आवश्यक आहे, तेव्हाच शेतकऱ्यांचा खर्च निघू शकतो.
केळीची लागवड, देखभाल, मजुरी, पाणी, खत व काढणी यासाठी शेतकऱ्यांचा प्रति एकरी सरासरी खर्च १ लाख रुपयांहून अधिक येतो. अशा स्थितीत सध्याचे भाव हे पूर्णपणे तोट्यात जाणारे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या चार वर्षांत हंगामी पिकांची अनिश्चितता पाहून खर्चिक पण फायद्याचे मानले जाणारे केळी पीक घेतले. मात्र, व्यापाऱ्यांच्या अनास्थेमुळे आज आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.- कारभारी दागोटे, शेतकरी
भाव नसल्याने व मालाचा उठाव न झाल्याने केळीचे घड झाडावरच पिकून जात आहेत. शासनाने तातडीने मदत केली नाही तर बागायतदार उद्ध्वस्त होतील.- सुनील पाटील, शेतकरी
मूल्य हमी योजनेची मागणी
काही महिन्यांपूर्वी केळीला निर्यातीतून चांगला दर मिळत होता. मात्र, सध्या तेच पीक देशांतर्गत बाजारात मातीमोल भावाने विकले जात आहे. यामुळे शेतकरी शासनाकडे मूल्य हमी योजना लागू करण्याची, थेट खरेदी करण्याची किंवा अनुदान देण्याची मागणी करत आहेत.
केळीला जर किमान १ हजार रुपये क्विंटल दर मिळाला तरच हे पीक फायदेशीर ठरेल; अन्यथा शेतकऱ्यांना सतत तोट्यातच जावे लागेल.