Join us

कशाला जायचे कुणाच्या प्रचाराला; रोहयो कामावर जाऊ पैसे कमवायला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 4:25 PM

१५६५ कामांवर २१६८५ मजूर

हिंगोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात स्थलांतरित बहुतांश मजूर परतले. मात्र, यापैकी अनेकांनी रोजगार हमीपेक्षा प्रचाराच्या कामाला गेल्यावर जास्त मजुरी मिळत असली तरीही कोणी बोलवायलाच तयार नसल्याने अनेकांनी रोजगार हमीच्या कामावर हजेरी लावली. मार्च व एप्रिल महिन्यात सरासरी २० हजार मजूर प्रतिदिन कामावर होते. तर मे महिन्यात उन्हामुळे थोडाबहुत परिणाम होताना दिसत आहे.

एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. ८ मेपर्यंत मग्रारोहयोवर ५२०१ कामे सुरू झाली. यापैकी ७५ पूर्ण झाली. यात औंढ्यात ४१० पैकी ०, औंढ्यात ३५६ पैकी ७, हिंगोली ११०८ पैकी २८, कळमनुरी ९८१ पैकी ४०, तर सेनगावात २३४६ पैकी एकही काम पूर्ण झाले नाही.

औंढ्यात २९ लाख, वसमत १७.७७ लाख, हिंगोली ५६.२१ लाख, कळमनुरी ४८.३३ लाख, सेनगावात १.७४ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

सेनगाव तालुक्यात कामे जास्त प्रमाणात सुरू होतात, मात्र ती अपूर्णच राहतात, असा अनुभव आहे. आता पुन्हा तेच सत्र सुरू झाले आहे. प्रशासनाने यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

मार्च, एप्रिलमध्ये मजूर वाढले

मार्च व एप्रिल महिन्यात अनेक ऊस कारखान्यांवरील मजूर निवडणुकीमुळे गावाकडे परतले. कारखान्यांचा एप्रिलमध्ये पट्टा पडल्याने असे मजूरही गावी आले. अशांनी निवडणुकीच्या प्रचारात काम शोधण्याऐवजी थेट मग्रारोहयोच्या कामावर जाणे पसंत केले. त्यामुळे या कामांवरील मजूर सरासरी २० हजारांच्या घरात गेले होते.

१५६५ कामांवर २१६८५ मजूर

८ मे रोजीच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यात १५६५ कामांवर २१६८५ मजूर आहेत. २८८१ मस्टर सुरू आहेत. यात ओढ्यात १२६ कामांवर १६१५, वसमत येथे ३०० कामांवर ४५५८, हिंगोलीत ४२४ कामांवर ६०९४, कळमनुरीत ३८४ कामांवर ४८६०, सेनगावात ३३१ कामांवर ४५५८ मजूर आहेत.

रोहयोवरील कामगार कमी होण्याची कारणे काय ?

काही ठिकाणी मशीनच बनल्या मजूर 

सर्वच कामे मजुरांनी झाले असे नाही, काही ठिकाणी मशीनने कामे करून मजुरांच्या नावे बिलं काढली. मात्र, हा प्रकार सुरूच असतो. तरीही मजुरांच्या हातालाही काही प्रमाणात काम मिळते. त्यामुळे अशा बाबींकडे दुर्लक्ष केले जाते.

३२३ ग्रामपंचायतींची कामे सुरु

हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी कामे सुरू करण्याचे प्रमाण वाढले आहे. औंढ्यात १०२ पेकी ३७, वसमतला ११९ पैकी ६५, हिंगोलीत १११ पैकी ७०, कळमनुरीत १२५ पैकी ८९, सेनगावात १०८ पैकी ६२ ग्रामपंचायतींनी रोजगार हमीची कामे सुरू केली आहेत. यापूर्वी मोजक्याच ग्रामपंचायती मग्रारोहयोची कामे करायच्या. ग्रामपंचायतींच्याच हाती बहुतांश कारभार गेल्याने कामे वाढत तर नाहीत?

हेही वाचा - हळदीला मिरचीची दिली जोड; सुभाषरावांचे दोन्ही पिकातून उत्पन्न झाले गोड

टॅग्स :हिंगोलीशेतकरीशेती क्षेत्रविदर्भबेरोजगारी