श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून युरिया खताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. ऊस पिकाचे क्षेत्र वाढले असून मेमध्ये झालेल्या पावसामुळे वेळेवर मशागतीसाठी खतांची प्रचंड गरज आहे.
मात्र, लिंकिंग विरुद्ध सरकारने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे खत कंपन्यांकडून युरिया देण्यास टाळाटाळ सुरू आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केला.
श्रीरामपूर तालुक्यास जवळपास ५०० टन युरियाचा बफर साठा आहे. मात्र, तो शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही व खत कंपन्यांकडून नवीन पुरवठा होत नाही.
यापुढे उपलब्ध होणारा युरिया सुद्धा जाणार अशी माहिती मिळाली. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांना युरिया मिळेल याची शाश्वती नाही. राज्याचे कृषिमंत्री व पालकमंत्री यांच्याकडूनही या प्रकरणी दुर्लक्ष होत आहे.
डीएपी व युरिया सारख्या खतांना मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडून अनुदान उपलब्ध होते. खत कंपन्यांकडून पुरवठा करण्यास असमर्थता का दर्शविली जाते, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
गेले एक वर्षापासून डीएपी खताची मागणी असूनही पुरवठा झालेला नाही. शासनाने शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खतांचा पुरवठा करावा, अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
पत्रकावर तालुकाध्यक्ष युवराज जगताप, उपाध्यक्ष हरिभाऊ तूवर, संपर्कप्रमुख शिवाजी जवरे, जिल्हा युवा आघाडीचे बच्चू मोडवे, अशोक काळे, नरेंद्र काळे, डॉ. दादासाहेब आदिक, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, डॉ. विकास नवले, अॅड. प्रशांत कापसे, अॅड. सर्जेराव घोडे, डॉ. रोहित कुलकर्णी, सतीश नाईक, सागर गिऱ्हे आदींच्या सह्या आहेत.
इतर खतांची विक्री थांबलीशेतकऱ्यासह व्यापारी खताचा रॅक लागण्याची वाट पाहत आहेत. युरिया उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्यांची इतर खते विक्री थांबली. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व फर्टिलायझर असोसिएशन यांच्याकडे सखोल चौकशी संघटनेने केली आहे. लिंकिंग (पुरवणी खते) बंद केल्यामुळे खत कंपन्यांकडून युरिया पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली जात आहे, असे निदर्शनास आले. हा विषय कृषी मंत्र्यांच्या अंतर्गत येतो, असे कृषी विभागाचे अधिकारी सांगतात.
अधिक वाचा: सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पेरणी अगोदर करायला विसरू नका ह्या १० गोष्टी