"आम्हाला आमच्या जमिनी प्रिय आहेत. याच काळ्या आईने आमच्या पिढ्या घडवल्या आहेत, आम्हाला हेच जीवन सोन्याचं वाटतं. आम्ही आमच्या जमिनी कोणत्याच प्रकल्पाला देणार नाहीत. त्यामुळे आमचा शेवटपर्यंत पुरंदरच्या विमानतळाला विरोध असणार आहे." पुरंदर तालुक्यातील मनेश हगवणे यांचे हे वाक्य. त्यांची संपूर्ण बागायती असलेली ८ एकर जमीन येथील विमानतळाच्या प्रकल्पासाठी जात असून त्यांच्यासहीत इतर स्थानिकांचा या प्रकल्पाला अजूनही विरोध आहे.
दरम्यान, या प्रकल्पाबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याचे आश्वासन दिले. तर मागील १० वर्षातील आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेले गुन्हे मागे घेऊन येथील शेतकऱ्यांसाठी स्कील सेंटर उभे केले जाईल असेही सांगितले. त्यामुळे महापालिका निवडणुका संपल्यानंतर साधारणपणे १५ जानेवारीपासून भूसंपादनाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुरंदर तालुक्यातील पारगाव, वनपुरी, कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि एखतपूर या गावामध्ये विमानतळाची सीमा असून पहिल्या टप्प्यात ३ हजार एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. पण शेतकऱ्यांचा यासाठी विरोध कायम असून आम्ही या प्रकल्पाला जमिनी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
आम्ही जमिनी दिल्या तर आम्ही जायचं कुठं, काय खायचं, सरकारने दिलेले पैसे खायचे का? आम्हाला घरं बांधायला कोण जागा देणार? असा सवाल वयस्कर पांडुरंग भामे यांनी केला आहे.
संमती मोजणीची, पोहोच भूसंपादनाची
सुरूवातीला जमीन मोजणी शेतकऱ्यांकडून समंती असल्याच्या सह्या घेण्यात आल्या पण त्यासाठी भूसंपादनाची समंती असल्याच्या पोहोच देण्यात आल्या होत्या. पण शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यावर पुन्हा त्यामध्ये दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना फसवलं जातंय का असा सवालही स्थानिक करत आहेत.
विरोधक महिलांना बैठकीसाठी येऊ दिले नाही
मुंबईत २३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीसाठी पारगाव येथील गेलेल्या महिलांना बैठकीसाठी बसू दिले नाही. पारगाव येथील महिला सरपंच ज्योती मेमाणे यांच्यासहित गावातील पाच महिलांना मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीच्या ठिकाणापासून २ ते अडीच किमी लांब अडवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रकल्पाला विरोध करणार म्हणून त्यांनी बैठकीला येऊ दिले नाही, शेतकऱ्यांचं मत ऐकून घेतलं जात नाही असाही आरोप पारगाव येथील सरपंच आणि इतर महिलांनी केला आहे.
सरकार लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहे. लोकांची दिशाभूल केली जात आहे. खऱ्या अर्थाने ही जागा विमानतळासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य नसतानाही, येथील जमिनी बागायती अन् दोनपेक्षा जास्त पिके घेण्यायोग्य असतानाही सरकारने याच ठिकाणी विमानतळ करण्याचा घाट का घातला हेच कळत नाही. पण या प्रकल्पासाठी आमचा शेवटपर्यंत विरोध असेल.- मनेश हगवणे (शेतकरी)
या प्रकल्पामुळे येथील तीन जणांचे जीव गेलेत. सरकारने हा रेटा असाच सुरू ठेवला तर विमानतळ पूर्ण होईपर्यंत येथील आणखी काही शेतकऱ्यांचे जीव गेलेले असतील. आमचा अहिंसेच्या मार्गाने कायदेशीर लढा शेवटपर्यंत असेल आणि या प्रकल्पाला शेवटपर्यंत विरोध असेल.- पी. एस. मेमाणे (आंदोलक, प्रकल्पाचे विरोधक)
Web Summary : Purandar farmers strongly oppose the airport project, refusing to surrender their fertile lands despite government assurances of compensation and skill centers. They allege deceptive land acquisition practices and express concerns about displacement and livelihood.
Web Summary : पुरंदर के किसान हवाई अड्डा परियोजना का कड़ा विरोध कर रहे हैं, सरकार के मुआवजे और कौशल केंद्र के आश्वासन के बावजूद अपनी उपजाऊ जमीन देने से इनकार कर रहे हैं। उन्होंने धोखे से भूमि अधिग्रहण करने का आरोप लगाया और विस्थापन और आजीविका के बारे में चिंता व्यक्त की।