Join us

आता बियाणे फसवणूक टळणार; खतांची विक्री पॉश मशीनवरून तशी बियाण्यांची विक्री साथी वरून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:05 IST

seed sathi portal खतांची विक्री पॉश मशीनवर केली जाते. या वर्षापासून बियाण्यांची विक्री कृषी विभागाच्या साथी अॅपवरून केली जाणार आहे.

खतांची विक्री पॉश मशीनवर केली जाते. या वर्षापासून बियाण्यांची विक्री कृषी विभागाच्या साथी अॅपवरून केली जाणार आहे.

त्यासाठी आधार संलग्नीकरण ही आवश्यक आहे. याद्वारे मान्यताप्राप्त, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांना मिळावेत असा शासनाचा हेतू आहे.

शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाल्याने पिकांची उगवण न झाल्याच्या तक्रारी दरवर्षी येतात. यामध्ये शेतकऱ्याची फसवणूक तर होतेच, शिवाय त्याचा हंगामही वाया जातो.

हे टाळण्यासाठी आता कृषी विभागाच्या साथी पोर्टलवरून बियाण्यांची विक्री केली जाणार आहे. शासन मान्यताप्राप्त व गुणवत्तापूर्ण बियाणे या पोर्टलवर उपलब्ध केले जाणार आहे.

याद्वारे बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांना आळा घातला जाणार आहे. शिवाय चढ्या दराने विक्रीलाही पायबंद बसणार आहे.

बियाण्यांची उगवण क्षमता, आर्द्रता, टक्केवारी आणि शुद्धता कृषी विभागाच्या निकषांनुसार असेल याची काळजी घेतली जाणार आहे.

साथी पोर्टल संदर्भात जिल्ह्यातील खते, बियाणे विक्रेते, कृषी विभागाचे अधिकारी व गुणनियंत्रक यांच्या उपस्थितीत मिरजेत कार्यशाळा झाली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, कृषी उपसंचालक डी.एम. पाटील, वाळव्याचे कृषी अधिकारी इंद्रजीत चव्हाण, मिरजेचे मिलिंद निंबाळकर, मोहीम अधिकारी लवटे, मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी निरंजन देसाई उपस्थित होते.

कार्यशाळेत ई-पॉस मशीन, सोयाबीन बियाण्याची साठवणूक व बीजप्रक्रिया, जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार खतांचा वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

बियाणे उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी करणे आवश्यक- बियाण्यांचे उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांना साथी पोर्टलवर नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे.- त्याशिवाय त्यांना बियाणे विक्री करता येणार नाही.- बियाण्याच्या पिशवीच्या लेबलवर बियाण्याची संपूर्ण माहितीही आवश्यक आहे.- खरिपापासून साथीवर नोंद असलेल्या विक्रेत्यांना बियाणे विक्रीची परवानगी असेल, अन्यथा बियाणे विक्री बेकायदा ठरवली जाईल.

कृषी विभागाची सज्जता१) कृषी आयुक्तालयातील संचालक सुनील बोरकर यांनी सांगितले की, जूनमध्ये खतांची आवश्यकता जास्त राहते. त्यादृष्टीने एप्रिल व में मध्येच साठा करून ठेवण्यात आला आहे.२) खत वापराची मात्रा सांगणारे फलक गावोगावी ग्रामपंचायत व खत विक्री केंद्रावर लावण्यात येत आहेत. खत विक्री करताना बिल देणे आवश्यक आहे. एमआरपीपेक्षा जास्त दराने विकल्यास कारवाई केली जाईल.३) खतासोबत इतर खते घेण्याची सक्ती म्हणजे लिंकिंग केल्यास ही कारवाई केली जाईल. खताचा उपलब्ध साठा व त्याच्या किमती दुकानाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.

अधिक वाचा: Namo Kisan Hapta : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीपेरणीखतेराज्य सरकारसरकार