Join us

‘सरकार कोणते असावे, हे ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 5:39 PM

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आवाहन, मोहाडी येथे ११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन.

सोन्याचा भाव वाढतो. मात्र रोजच्या जगण्यासाठी अनमोल असणाऱ्या आमच्या गहू तांदळाचा भाव का वाढत नाही? हा ही प्रश्न मला पडतो. देशाला रोज अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार  मात्र दुर्लक्ष करते ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांनी आता अशा दुर्लक्ष करणाऱ्या सरकारकडे काही मागू नये. सरकार कोणते करायचे हे ठरविण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण करावी. असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स येथे सोमवार (ता.४) पासून दोन दिवसीय अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नाना पाटेकर बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत.

केवळ गोंजारणारे दु:ख मांडू नका. स्वत:च्या धमण्यांत वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा. शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडा जगावं की मरावं हा एकच सवाल आहे..या नटसम्राट मधील संवादाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, शेतकऱ्याने आता मरु नये. जगावं. केवळ चांगले दिवस येतील याची वाट पाहू नये तर जिद्दीने चांगले दिवस आणावे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी साहित्य संमेलनाच्या उपक्रमाला नाम फाऊंडेशनकडून दोन लाख रुपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, ज्येष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे, माजी आमदार सरोजताई काशीकर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, सह्याद्री फार्म्स चे अध्यक्ष विलास शिंदे, अखिल भारतीय शेतकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाधर मुटे, संमेलनाचे संयोजक ऍड. सतिश बोरुळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, शरद जोशी यांनी मांडलेल्या चतुरंग शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यावर सह्याद्री फार्म्स मार्फत प्रयत्न केला आहे. शरद जोशींची ही संकल्पना भारतीय शेतीचे भवितव्य उजळवणारे आहे.

पुष्पराज गावंडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवनावर साहित्य लिहिणारे मोठे होतात मात्र त्यामुळे शेतकऱ्याचे आयुष्य बदलत नाही. साहित्यिक आणि शेतकरी दोघेही मोठे व्हावेत.

सरोजताई काशीकर म्हणाल्या, शेतकऱ्यांसोबत रडणे एवढ्यापुरतेच शेतकरी साहित्य मर्यादित नाहीत. शेतकऱ्याला खंबीरपणे या दुःखातून बाहेर आणणारे साहित्य निर्माण करण्यावर साहित्यिकांनी भर द्यावा. ॲड. वामनराव चटप म्हणाले, शरद जोशींचे चतुरंग शेतीचे प्रयत्न सह्याद्रीच्या प्रकल्पातून पुढे नेले जात आहे.

वैचारिक साहित्यही महत्वाचे : भानू काळे

संमेलनाध्यक्ष भानू काळे म्हणाले की, साहित्य म्हणजे फक्त ललित साहित्य अशा मर्यादित अर्थाने साहित्याकडे पाहिले जाते. विचार प्रधान साहित्य हा साहित्याचा तितकाच महत्वाचा भाग आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडणाऱ्या साहित्याकडेही सन्मानाने पाहिले पाहिजे.

काळे यांनी शरद जोशी यांच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, जोशी यांनी शेतकऱ्यांमधील स्वाभिमान जागवला. त्याच्यातील आत्मसन्मान जागवला. अनुदान संस्कृतीवर त्यांनी कधीच भर दिला नाही. केवळ आंदोलनाने शेती प्रश्‍न सुटणार नाहीत याची जाणीव शरद जोशींना होती. एका मर्यादपर्यंत ठिणगी गरजेची असते पुढे दीर्घकाळ ज्योतीचीच गरज असते. स्वित्झर्लंड या देशातील शेतकरी संघटना आणि तंत्रज्ञान याचा प्रभाव त्यांच्यावर होता. चतुरंग शेतीची संकल्पना या मागे महात्मा जोतिबा फुले यांची प्रेरणा होती. असेही त्यांनी सांगितले.

शेती अर्थ प्रबोधिनीचे गंगाधर मुटे यांनी प्रास्ताविक केले. एच-स्क्वेअर इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :नाना पाटेकरशेतकरीशेती क्षेत्रशेती