Join us

Monsoon Rain : लवकर आलेल्या पावसामुळे भाताच्या नर्सरींना अडचणी; बियाणे उगवण्याचे प्रमाण घटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 21:53 IST

महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते. मृग नक्षत्राच्या सुरूवातीला म्हणजे  मान्सूनच्या पहिल्या सरी पडल्या की भात रोपवाटिकेची तयारी शेतकऱ्यांकडून केली जाते. पण यंदा मे महिन्यापासूनच जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भात रोपवाटिकेसाठी लागणारी मातीची अवस्था राहिली नाही.

Pune : यंदा मान्सूनच्या पावसापूर्वीच मान्सूनपूर्व वादळी वाऱ्याच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पश्चिम घाट परिसरात भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना भात रोपवाटिकेसाठी अडचण निर्माण झाली आहे. बियाणे टाकण्यासाठी जमिनीची अवस्था अनुकूल नसल्यामुळे यंदा भाताचे रोप काही प्रमाणात कमी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते. मृग नक्षत्राच्या सुरूवातीला म्हणजे  मान्सूनच्या पहिल्या सरी पडल्या की भात रोपवाटिकेची तयारी शेतकऱ्यांकडून केली जाते. पण यंदा मे महिन्यापासूनच जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भात रोपवाटिकेसाठी लागणारी मातीची अवस्था राहिली नाही. बियाणे उगवून येण्यासाठी जमीनीमध्ये हवा खेळती, उबदारपणा आणि आर्द्रता असणे आवश्यक आहे. पहिल्या पावसात जमिनीमध्ये उबदारपणा आणि आर्द्रता निर्माण होते आणि बियाणे उगवून येण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. मातीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने चिखलात बियाणे पेरले तर त्याची उगवणक्षमता कमी होण्याची शक्यता आहे. 

पावसाचे पाणी थांबण्यासाठी जागा नाही अशा घाटमाथ्यावर अनेक शेतकरी २५ मे च्या आसपास भाताची धूळपेरणी करतात. त्यानंतर जसा पाऊस पडेल तसे हे बियाणे उगवून येते. पण यंदा तेही न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार चिखलात रोपवाटिकेची तयारी केली तर एकूण बियाणांपैकी १० ते १५ टक्के बियाणे वाया जाऊ शकते. तर शेतकऱ्यांचे घरचे बियाणे असल्यामुळे शेतकरी रोपवाटिकेसाठी जास्त बियाणे वापरण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मान्सूनच्या इतिहासातील खूप कमी वेळा घडणारी घटना यावर्षी घडली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सरासरीच्या तुलनेत १२ दिवस आधी म्हणजे २५ जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस दाखल झाला. पण त्यापूर्वीही महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडवली होती. यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, वेल्हे आणि भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना भात रोपवाटिकेसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लवकर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना रोपवाटिकेसाठी बियाणे जास्त लागण्याची शक्यता आहे. यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी उंचीच्या ठिकाणी रोपवाटिका तयार केल्या आहेत. यंदा जर रोपांची कमतरता भासली तर शेतकरी जिथे ५-६ रोपं लावतात तिथे २-३ रोपं लावतील पण भात लागवडीसाठी रोपांची खूप कमतरता भासेल अशी स्थिती येण्याची शक्यता कमी आहे.- नवीन बोऱ्हाडे (उपकृषी अधिकारी, मावळ) 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी