सोमनाथ खताळ
मजुरीसाठी राबणाऱ्या हातांनाच आता आरोग्याचं कवच मिळणार आहे. बीड जिल्ह्यातून सुरू होणाऱ्या 'मिशन साथी' योजनेतून ऊसतोड मजुरांच्या टोळीतूनच एक महिला आता 'आरोग्य साथी' म्हणून काम करणार आहे. (Ustod Mahila Kamgar)
गर्भपिशवी शस्त्रक्रियांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम महिलांच्या आरोग्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. ऊसतोड मजुरांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी बीड जिल्ह्यातून 'मिशन साथी' या नव्या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. (Ustod Mahila Kamgar)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी या योजनेचे औपचारिक उद्घाटन होईल. मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या 'आयुर्मंगलम' योजनेच्या अपयशानंतर आता 'मिशन साथी' योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.(Ustod Mahila Kamgar)
मागील योजना, अपयश आणि नव्या सुरुवातीची गरज
बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड मजुरांची कळीचे केंद्र मानला जातो. याच पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०१० मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 'आयुर्मंगलम' ही योजना सुरू करण्यात आली होती.
या योजनेत ऊसतोड मजुरांच्या आरोग्यासाठी अनेक सुविधा देण्यात यायच्या; मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ती योजना कागदावरच राहिली.
२०१९ मध्ये या दुर्लक्षिततेचा भयावह परिणाम समोर आला, जेव्हा ऊसतोड मजूर महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रियांचे प्रकरण उघडकीस आले.'लोकमत'च्या वृत्तानंतर खळबळ उडाली आणि डॉ. नीलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली.
नंतर नवीन SOP (Standard Operating Procedure) जारी करून शस्त्रक्रियांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न झाला, पण काही वर्षांतच त्यालाही फाटा बसला.
'लोकमत'च्या बातमीनंतर पुन्हा हालचाल सुरू
'लोकमत'ने पुन्हा एकदा या विषयावर प्रकाश टाकला. २०२५ पूर्वी ८४३ ऊसतोड मजुरांवर शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आल्यानंतर बीडपासून दिल्लीपर्यंत या विषयावर हालचाली सुरू झाल्या.
लोकसभेतही हा मुद्दा चर्चेत आला आणि अखेर शासनाने 'मिशन साथी' योजना तातडीने राबवण्याचा निर्णय घेतला.
'मिशन साथी' योजना नेमकी काय आहे?
ही योजना म्हणजे ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची पहिली सुरक्षा फळी.
प्रत्येक ऊसतोड मजुराचे सर्वेक्षण व नोंदणी करून ओळखपत्र दिले जाईल.
महिलांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार.
प्रत्येक टोळीत (गटात) एक महिला मजूरच 'आरोग्य साथी' म्हणून नेमली जाईल.
या आरोग्य साथी महिलेला आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देऊन प्रथमोपचार किट दिले जाईल.
ही महिला गावातील आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य केंद्रांशी संपर्कात राहील.
ऊसतोडीच्या काळात इतर राज्यांमध्ये गेल्यानंतरही ती बीडच्या यंत्रणेशी संपर्कात राहणार.
'मिशन साथी' ही योजना ७ ऑगस्ट रोजी उद्घाटन करत आहोत. गटातीलच एक महिला 'आरोग्य साथी' म्हणून काम करेल. नोंदणी, ओळखपत्र, योजनांची माहिती पुस्तिका हे सर्व कामगारांना दिले जाणार आहेत. आरोग्यदृष्ट्या ही योजना फार महत्त्वाची ठरणार आहे. - विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड
महिलांच्या सक्षमीकरणाचे पाऊल
'मिशन साथी' योजना म्हणजे केवळ आरोग्य सेवाच नाही, तर मजूर महिलांच्या सक्षमीकरणाचा एक पायरी आहे. टोळीतीलच एक महिला या कामात सक्रिय राहणार असल्यामुळे स्थानिक नेतृत्व, आरोग्याविषयी जागरूकता, आणि गटशक्ती यांना चालना मिळेल.
२०१९ मधील घटना हे या व्यवस्थेतील त्रुटी दाखवून गेल्या. मात्र 'मिशन साथी'मुळे पुन्हा एकदा आशेचा किरण दिसत आहे. या योजनेची अंमलबजावणी केवळ उद्घाटनापुरती मर्यादित न राहता, सतत आणि ठोसपणे कार्यान्वित झाली, तर बीडसारख्या जिल्ह्यांतील हजारो मजूर महिलांचे आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकते.
हे ही वाचा सविस्तर : Ustod Mahila Kamgar: बीडच्या ऊसतोड महिलांची वेदना संसदेत; सरकारकडून चौकशी आदेश!