नाशिक : अवकाळी पावसाचा (Avkali Paus) मोठा फटका आंबा, कांदा व भाजीपाला पिकास बसला असून, ३,४५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान १० मे अखेर झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) विश्रांती घेतली होती. पण, रविवारी पुन्हा नाशिक तालुक्यासह (Nashik Taluka) जिल्ह्यातील इतर भागांत अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. त्यामुळे पिकांच्या नुकसानीचा आकडा वाढू शकतो. आठवडा झाला, तरी अनेक भागांत ढगाळ वातावरण कायम आहे.
६०० गावांतील १४ हजार शेतकऱ्यांचे नुकसानजिल्ह्यातील ६०० गावांमधील १४ हजार ६१३ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान सुरगाना व पेठ तालुक्यांत झाले आहे. यात सुरगाना तालुक्यात ५९४, तर पेठ तालुक्यातील १,२५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यात ४,५११, तर पेठ तालुक्यात ४,८१९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सटाणा तालुक्यात कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पाच दिवसांपूर्वी दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान दर्शविण्यात आले होते. पण, त्यानंतरही नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याचे काम सुरू होते.
खरिपाची तयारी असल्याने चिंता कमीचसध्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण असले, तरी फारशी चिंता नाही. कारण, खरीप हंगामासाठी तयारी सुरू असल्याने शेत रिकामेच आहे. मात्र, काढून ठेवलेला कांदा, तोडणीस आलेला अखेरचा कांदा, भाजीपाला, आंबा याच पिकांना अवकळीची झळ बसली आहे. अन्यथा हेक्टरप्रमाणे नुकसानीचा आकडा वाढला असता.
कृषिमंत्र्यांकडून पाहणी नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले आहे. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे महसूल, कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा, अशा सूचना मंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले.