Join us

अतिवृष्टीने उद्ध्वस्त संसार: रामकलाबाईंचा टाहो 'साहेब, आता दिवाळी कशी साजरी करू?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:15 IST

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि ढगफुटीने अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त केले. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील रामकलाबाई कोल्हे या त्यातीलच एक बळी ठरल्या आहेत. 'साहेब, सर्व होत्याचं नव्हतं झालं... आता दिवाळी कशी साजरी करू?' या शब्दात त्या आपल्या आयुष्याची हकीगत सांगतात.

श्यामकुमार पुरे/ सोपान कोठाळे 

सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात सुमारे ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, हजारो एकर जमीन खरहून गेली. या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला तो केळगावच्या शेतकरी रामकला शिवाजी कोल्हे यांना.

“साहेब, सर्व होत्याचं नव्हतं झालं. पिकं वाहून गेली, शेती खरडून गेली. डोक्यावर पाच लाखांचं कर्ज, घरात खायला अन्नही नाही. आता दिवाळी काय साजरी करू?” अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रामकलाबाई सांगतात.

२०१६ मध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांच्या पतीने आत्महत्या केली. तेव्हापासून दोन लहान मुलांचं संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी रामकलाबाईंच्या खांद्यावर आहे. 

यंदा त्यांनी मका आणि कापूस अशी खरीप पिकं घेतली होती; मात्र अतिवृष्टीमुळे सर्व स्वप्नं वाहून गेली. सुमारे दोन एकर शेती खरडून गेल्याने लाखोंचा तोटा झाला आहे.

त्यांच्या डोक्यावर सोसायटी व ग्रामीण बँकेचे मिळून एक लाख रुपयांचे कर्ज आहे, तर विहीर खोदण्यासाठी घेतलेल्या खासगी कर्जाची रक्कम चार लाखांपर्यंत पोहोचली आहे.

“शासनाने तरी आता मदतीचा हात द्यावा. कर्जमाफी मिळावी, मुलांना दिवाळीत कपडे-गोडधोड द्यायचे स्वप्न पूर्ण करायचं आहे... अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही,” असे म्हणत त्या पुन्हा डोळे पुसतात.

केळगावसह संपूर्ण सिल्लोड तालुक्यातील शेतकरी या आपत्तीने हतबल झाले आहेत. रामकलाबाईंचं दु:ख हे त्या हजारो शेतकऱ्यांचं प्रतिबिंब आहे, जे आजही पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतीकडे असहायपणे पाहत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Crop Insurance Scam : शेतकऱ्यांची फसवणूक रोखली ग्रामस्थांच्या सतर्कतेने 'मापात पाप' प्रकरण उघड

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Destroy Family: Ramkalabai Asks, 'How to Celebrate Diwali?'

Web Summary : Excessive rain devastated Ramkalabai Kolhe's farm, leaving her with debt and despair. Facing poverty and burdened with loans after her husband's suicide, she struggles to provide for her children and fears a bleak Diwali. She pleads for government assistance.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती