Join us
Daily Top 2Weekly Top 5

माळरानावर फुलवले डाळिंबाचे सुपर भगवा वाण, पाच लाखांचा निव्वळ नफा, कसं केलं नियोजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:35 IST

Dalimb Farming : योग्य नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन आणि आधुनिक पद्धतींचा वापर यामुळे त्यांच्या बागेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. 

नाशिक : हडपसावरगाव (ता. येवला) येथील प्रगतिशील शेतकरी योगेश संपत कोल्हे यांनी माळरानावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 'सुपर भगवा' वाण डाळिंब बाग फुलवून आदर्श निर्माण केला आहे. योग्य नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन आणि आधुनिक पद्धतींचा वापर यामुळे त्यांच्या बागेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. 

योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांचा लाभ घेतल्यास शेतीतून भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचा आदर्श हडपसावरगावातील या उपक्रमातून समोर आला आहे. या बागेसाठी सहायक कृषी अधिकारी हरिभाऊ खोमणे (जायदरे) यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यानुसार कोल्हे यांनी चालू वर्षी जूनमध्ये बहार धरण्याचे नियोजन केले आहे. 

पाणी आणि खतांचे नियोजन 

परागीभवनासाठी मधमाशी पेट्यांचा वापर करण्यात आला असून जिवामृत, बीजामृत व सेंद्रिय स्लरीचा उपयोग करून बागेची जोपासना केली जात आहे. व्यवस्थापनासाठी शेततळ्यातील पाण्याचा व ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. उन्हाळ्यात इतर पिकांच्या तुलनेत डाळिंब पिकात ठिबक सिंचन जास्त वेळ चालवता येत असल्याने उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होत आहे. 

उत्पन्नाची अपेक्षा किती? 

सुमारे ४०० झाडांपासून प्रत्येकी सरासरी १५ किलो उत्पादन अपेक्षित असून एकूण ६ टन (६,००० किलो) उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. प्रतिकिलो किमान १०० रुपये दर गृहीत धरल्यास सुमारे ६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. एकरी सुमारे १ लाख खर्च वजा जाता अंदाजे ५ लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कुटुंब व कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनया फळबागेच्या जोपासनेसाठी संपत कोल्हे, अर्चना कोल्हे, शीतल कोल्हे, सुरेखा कोल्हे व नितीन कोल्हे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, मंडळ कृषी अधिकारी हितेंद्र पगार, उपकृषी अधिकारी मधुकर वरपे आणि सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक राम निंबाळकर यांचेही मार्गदर्शन मिळाले.

एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी फळबाग शेतीकडे वळणे गरजेचे आहे. कांदा पिकावर मोठा खर्च करूनही बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतात. डाळिंब लागवड केल्याने चांगले उत्पन्न मिळू शकते.- योगेश कोल्हे, प्रगतिशील शेतकरी

English
हिंदी सारांश
Web Title : Pomegranate Farming Success: Barren Land to ₹5 Lakh Profit with Super Bhagwa.

Web Summary : Farmer Yogesh Kolhe transformed barren land into a profitable pomegranate farm using the Super Bhagwa variety and government schemes. He expects ₹6 lakh income from 400 trees, netting ₹5 lakh profit through efficient water, fertilizer management, and expert guidance.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीडाळिंब