Agriculture News : सर्व दूर पाऊस सुरू असून राज्यातील अनेक भागात पेरण्यांनी (Sowing) वेग घेतला आहे. 20 जून अखेर राज्यात 33 लाख 59 हजार 81 हेक्टरवर पेरण्या झाल्या असून सर्वाधिक पेरण्या लातूर विभागात झाली असून दुसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजी नगर विभाग आहे.
गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील काही भागात मुसळधार (Heavy rain) पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा जवळपास 123 टक्के पेरण्या अधिक झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे.
राज्यात खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढल्याचे दिसून आले आहे. तर मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिले असता यंदा सरासरीच्या 23.27 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. जमिनीला वाफसा येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे विशेषतः सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये, मका, बाजरीच्या पेऱ्यात वाढ झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.
विभागनिहाय पेरणी अहवाल दरम्यान राज्यातील विभागनिहाय पेरणी अहवाल पाहिला असता कोकण विभागात 16 हजार 79 हेक्टर, नाशिक विभागात पाच लाख 9 हजार 11 हेक्टर, पुणे विभागात चार लाख 51 हजार 507 हेक्टर, कोल्हापूर विभागात एक लाख 68 हजार 568 हेक्टर, छत्रपती संभाजी नगर विभागात सहा लाख 57 हजार 119 हेक्टर, लातूर विभागात नऊ लाख चार हजार 202 हेक्टर, अमरावती विभागात पाच लाख 61 हजार 880 हेक्टर, तर नागपूर विभागात 9535 हेक्टर वर पेरण्या झाल्या आहेत.