विवेक चांदूरकर
शेतीतली खरी क्रांती मातीच्या आरोग्यात दडलेली आहे. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्यूरोचे संचालक डॉ. नितीन पाटील सांगतात, थ्री-डी व्हिडिओ, डिजिटल मृदा नकाशा आणि एआयच्या साहाय्याने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या प्रत्येक कणाची माहिती मिळणार आहे. उत्पादन वाढवून मातीचे आरोग्य जपण्याचा हा नवा मार्ग कसा असेल, जाणून घ्या या खास मुलाखतीत. (Soil Health Management)
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्यूरोद्वारे कोकण वगळता अन्य राज्यांतील शेतीचा डिजिटल मृद नकाशा एआयसह विविध तंत्रज्ञानांच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. (Soil Health Management)
त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या आरोग्याची माहिती थ्रीडी व्हिडिओच्या माध्यमातून देणे शक्य होईल, अशी माहिती राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्यूरोचे संचालक डॉ. नितीन पाटील यांनी माहिती दिली. (Soil Health Management)
अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय खरीप शिवार फेरीमध्ये डॉ. नितीन पाटील सहभागी झाले होते. (Soil Health Management)
मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्यूरोद्वारे मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत?
ब्यूरोद्वारे कोकण वगळता इतर राज्यांसाठी डिजिटल मृदा नकाशे तयार करण्यात आले आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि जिओ-टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने शेतजमिनीतील उंच-सखल भाग, निचरा क्षमता आणि पाणी साचण्याचे प्रमाण गटक्रमांकानुसार नोंदवले जात आहे. यामुळे अतिवृष्टीनंतर नुकसान झालेल्या भागांचा तात्काळ अंदाज घेता येईल, पंचनामे सुलभ होतील आणि नैसर्गिक संकटांपूर्वीच उपाययोजना करता येतील.
शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल?
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या आरोग्याची माहिती मिळाल्यानंतर संतुलित खताचा पुरवठा करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उत्पादनखर्च वाचेल व मातीचे आरोग्यही अबाधित राहील.
तसेच उत्पादनातही वाढ होईल. यासोबतच शेतातील मातीच्या आरोग्यानुसार कोणती पिके घ्यावी, कोणत्या पिकांचे किती उत्पादन येऊ शकते, याचीही माहिती मिळणार आहे.
रासायनिक खतांच्या वापरामुळे मातीचे आरोग्य बिघडत आहे काय?
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी करण्यात येत आहे. हा आंतरराष्ट्रीय अजेंडा आहे. भारतातील शेतकरी जास्त प्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करतात, असा प्रचार करण्यात येत आहे.
मात्र, पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतात रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर कमी आहे. महाराष्ट्रातील मातीचे आरोग्य जेवढा अपप्रचार करण्यात येत आहे.
रासायनिक खते व कीटकनाशकांमुळे कर्करोग व हृदयविकार होत आहेत काय?
याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती नाही. आता आरोग्याबाबत जागृती वाढली आहे. अनेक नागरिक रुग्णालयात जाऊन तपासण्या करीत आहेत. त्यामुळे आजारांचे निदान होत आहे. पूर्वी दवाखाने कमी होते, तपासण्या होत नव्हत्या.
मात्र, आजार पूर्वीही होतेच. दर १०० वर्षांनी महामारी येत होती. एक तृतीयांश लोकसंख्या कमी होत होती. आता कोरोनाकाळात त्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी होते; कारण वैद्यकीय क्षेत्र प्रगत झाले आहे. त्यामुळे रासायनिक खते व कीटकनाशकांमुळेच हे सर्व होत आहे, हे निश्चित सांगता येणार नाही.
मातीचे आरोग्य चांगले ठेवण्याकरिता उपाययोजना काय आहेत?
संतुलित खताचा वापर करायला हवा. खताचा वापर अती व कमी करू नये. योग्य मात्रेत खत द्यायला हवे. बहुतांश खते विदेशांतून आयात करण्यात येतात.
खतांचा वापर संतुलित झाला तर आयात कमी होईल. देशातील पैसा देशातच राहील. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी होण्यास मदत मिळेल.
हे ही वाचा सविस्तर : Krishi University : शेतीत प्रगती साधायची आहे का? मग या शिवारफेरीला हजेरी लावा!