त्र्यंबकेश्वर : आषाढ वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj Palkhi0 यांच्या पालखी दिंडीचा रथसोहळा १० जून रोजी प्रस्थान होणार आहे. पहिला मुक्काम गुरु गहिनीनाथांच्या सान्निध्यात महानिर्वाणी पंचायती आखाड्यात होईल.
आषाढी वारीसाठी दरवर्षीं हजारो भाविक संत निवृत्तीनाथ पालखी (Sant Nivruttinath Palkhi) सोहळ्यात सहभागी होतात. यंदाही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार असून १० जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे. जिल्ह्यापासून सिन्नरपर्यंत विविध ठिकाणी मुक्काम करत दिंडी १६ जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करेल. तेथून सोलापूरमार्गे ६ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आगमन होईल.
असा आहे पालखीचा प्रवास
तर संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळा दिनांक १० जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे. हा पालखी सोहळा रविवार दिनांक १५ जून रोजी सिन्नर तालुक्यात पोहोचेल. या दिवशी दातली या ठिकाणी पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर सोमवार २३ जून रोजी अहिल्यानगर येथे संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा सकाळी दहा ते बारा या वाजेपर्यंत पार पडेल.
त्यानंतर पुढे शनिवार दिनांक २८ जून रोजी कर्जत येथील धांडे वस्ती येथे उभे रिंगण पार पडेल. सोमवार दिनांक ३० जून पर्यंत पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात पोहोचून पुढे ०३ जुलै रोजी करकंब या ठिकाणी गोल रिंगण पार पडेल. शुक्रवार ०४ जुलै रोजी पालखी सोहळा पांढरीच्या वाडीला पोहोचेल तिथून पुढे दोन दिवस पंढरपूर दर्शन आणि त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल.