मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्न, धान्याचे (शिधा) वितरण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या (Ration Dukan) मार्जिनच्या रकमेेत वाढ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना (Ration Card) ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्याच्या वितरणासाठी रास्त भाव दुकानदारांना सध्या देण्यात येणाऱ्या १५० रुपये प्रति क्विंटल (१५०० रुपये प्रति मेट्रिक टन) या मार्जिन दरामध्ये २० रुपये प्रति क्विंटल (२०० रुपये प्रति मेट्रिक टन) एवढी वाढ करून त्यांना १७० रुपये प्रति क्विंटल (१७०० रुपये प्रति मेट्रिक टन) मार्जिन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजित वार्षिक ९२.७१ कोटी इतका अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, गेले अनेक दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांची मार्जिन मध्ये वाढ करण्याची मागणी होती. याबाबत अनेक बैठका देखील पार पडल्या होत्या.
रास्त भाव दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक होते त्यामुळे आज मंत्रिमंडळाने रास्त भाव दुकानदारांच्या मार्जीन मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.