Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम गुणवत्ता आणि उत्पादनासाठी नैसर्गिक शेती पद्धतीने संत्रा बाग व्यवस्थापन, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:25 IST

Orange Orchard Management : आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक पद्धतींचा संगम साधला तर शेती अधिक नफ्याची आणि शाश्वत होऊ शकते.

अमरावती :शेती हा परंपरागत व्यवसाय असला तरी त्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक पद्धतींचा संगम साधला तर शेती अधिक नफ्याची आणि शाश्वत होऊ शकते. हे पिंपरी पूर्णा येथील प्रगतशील शेतकरी पुष्पक श्रीरामजी खापरे यांनी आपल्या प्रयोगशील कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे. नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून संत्रा बाग व्यवस्थापनात यश मिळवले आहे.

पारंपरिक रासायनिक शेतीमुळे वाढणारा खर्च आणि जमिनीची घटणारी सुपीकता लक्षात घेऊन खापरे यांनी काही वर्षांपूर्वी नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारला. देशी गायीच्या शेण व गोमूत्रापासून तयार होणारे जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून त्यांनी जमिनीची सुपीकता वाढवण्यावर भर दिला. या प्रक्रियेमुळे जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय राहून पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते.

असे केले व्यवस्थापन संत्रा बागेच्या व्यवस्थापनात खापरे यांनी आच्छादन (मल्चिंग) पद्धतीचा प्रभावी वापर केला आहे. झाडांच्या भोवती पेंढा, गवत आणि सेंद्रिय अवशेषांचे आच्छादन केल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तणांची वाढ कमी होते आणि जमिनीतील सेंद्रिय अंश वाढण्यास मदत होते. परिणामी पाण्याची बचत होत असून पिकांची वाढ अधिक जोमदार होते.

नैसर्गिक द्रव्यांचा वापरसंत्रा झाडांची वाढ योग्य प्रकारे व्हावी आणि सर्व फांद्यांना समान सूर्यप्रकाश मिळावा, यासाठी त्यांनी फांदी वाकवण्याची (Canopy Management) पद्धत अवलंबली आहे. या पद्धतीमुळे झाडांची उंची नियंत्रित राहते आणि झाडाचा विस्तार संतुलित राहतो. त्यामुळे फळधारणा चांगली होते आणि फळांची गुणवत्ता सुधारते. कीड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून त्यांनी दशपर्णी अर्क, नीम अर्क, अग्नि अस्त्र आणि ब्रह्मास्त्र, बुरशीनाशक यांसारख्या नैसर्गिक द्रव्यांचा वापर सुरू केला आहे. 

पाणी आणि खत व्यवस्थापन संत्रा बागेत ठिबक सिंचन प्रणाली बसविण्यात आली आहे. पिकांना आवश्यक तेवढेच पाणी दिले जाते. त्याचबरोबर खत व्यवस्थापन देखील ठिबकद्वारे प्रभावीपणे करता येते. खापरे यांनी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर, गांडूळखत निर्मिती, तसेच मिश्रपीक आणि आंतरपीक पद्धती अवलंबून जमिनीतील पोषण संतुलन राखण्यावर भर दिला आहे. संत्रा बागेत डाळीवर्गीय पिके आणि इतर पूरक पिके घेतल्यामुळे जमिनीतील नत्राची पातळी वाढण्यास मदत होते.

गुणवत्ता, उत्पादन वाढले!संत्रा उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी परदेशातील प्रगत शेती पद्धतींचाही अभ्यास केला आहे. विशेषतः संत्रा लागवडीतील व्यवस्थापन, झाडांची उंची नियंत्रण, आणि फळांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांच्या या प्रयोगशील कार्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला असून संत्र्यांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला आहे. 

 

 टरबूज शेती ठरली फायदेशीर, सव्वाचार एकरांतून तब्बल 18 लाखांचे उत्पन्न, कसं केलं नियोजन

 

English
हिंदी सारांश
Web Title : Natural farming boosts orange yield and quality: A success story

Web Summary : Puspak Khapre achieved success in orange farming using natural methods. He focused on soil fertility with organic components and effective water management. Canopy management and natural pest control further enhanced fruit quality and increased yield while reducing costs.
टॅग्स :शेती क्षेत्रसेंद्रिय शेतीशेतकरीशेती