Join us

Kharif Season : पावसानं केला खेळ, जमिनीत ओलावा, वाफसा धरण्यास वेळ, पेरण्या लांबणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:26 IST

Kharif Season : अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले.

Kharif Season : साधारणपणे मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पारंपरिक पद्धतीने जमिनीची मशागत (Cultivation) करतात. बीज अंकुरण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असल्याने जमिनीच्या नैसर्गिक आर्द्रतेचा उपयोग करून राबभाजणी केली जाते. मात्र मे महिन्यातील पंधरवड्यातच अवकाळी पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला. 

त्यामुळे मशागतपूर्व कामांना खीळ बसली. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील (Kharif Season) धूळवाफे पेरणी करता आली नाही. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी अडचणीत आला आहे. अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले.

मे महिन्यात नांगरणी, कुळवणी, गवत काढणे आणि खतांची पूर्वतयारी केली जाते. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पावसामुळे भिजल्या असल्याने यंदा हे काम वेळेवर होत नाही आहे. परिणामी वाफसा धरण्यास लागणारा वेळ वाढला असून जूनच्या सुरुवातीस पेरणी करण्याची अडचण निर्माण झाली आहे. 

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, मालेगाव तालुक्यात खरीप हंगामात अंदाजे ९५,२६८ हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाणार आहे. खरीप मका जवळपास ३८ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर तर बाजरीचे २६ हजार ७०० हेक्टर क्षेत्र तसेच कापूस २५ हजार ७९८ हेक्टर क्षेत्र लागवडीचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे भुईमुगाची पेरणी १ हजार २३६ हेक्टर क्षेत्रावर होण्याचा अंदाज आहे. 

वेळेवर पेरणी न झाल्यास या सर्व पिकांच्या उत्पादनात घट येऊ शकते. विशेषताः डाळिंब, कापूस व भुईमूग पिकांसाठी १० ते २५ जून हा आदर्श पेरणी कालावधी मानला जातो. यामध्ये उशीर झाला तर उत्पादनात १५ ते ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे जमिनीत ओलावा आहे, पण मशागत नाही. मशीन घेतली तरी चिखलात जाऊ शकत नाही. जूनमधल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण होईल का याची शंका आहे. - विजय घोडके, शेतकरी

यंदा निसर्गाचे थोडे चक्र बदलले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता वाफसा स्थिती आल्यानंतरच पेरणी करावी, उशीर झाला, तरी बियाण्याची योग्य निवड केल्यास तोटा टाळता येतो.- भगवान गोर्डे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीखरीपलागवड, मशागत