Join us
Daily Top 2Weekly Top 5

जमीन खरेदी करताना खरेदीदाराकडे शेतकरी दाखला असणे अनिवार्य, काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:05 IST

Jamin Kharedi : जळगाव जिल्ह्यातील एका प्रकरणामुळे शेत जमीन खरेदी करताना शेतकरी दाखला आवश्यक का आहे, हे समोर आले आहे.

जळगाव : चोपडा शहरातील काही व्यापाऱ्यांनी संगनमताने शेतकरी असल्याबाबत दाखला सादर न करताच तालुक्यातील चौगात शिवार, वराड रस्त्यावरील करोडो रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचा महाघोटाळा माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश मगनलाल शिरसाठ यांनी उघडकीस आणला असून त्यांनी दाखल केलेल्या दाव्यावर निकाल देत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी एकूण ११ गटातील शेतजमीन शासनजमा करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील व्यापारी प्रकाश केशरलाल जैन, अनुप प्रकाश जैन, निशा अनुप जैन (पांचाळेश्वर राजेंद्र गल्ली) यांनी चौगाव शिवारातील एकूण ९ गट तर दुसऱ्या प्रकरणात इस्माईल इसाक बागवान, हिना इस्माईल बागवान (केजीएन कॉलनी) यांनी वराड शिवारातील २ गट बळकावले होते. यासाठी त्यांनी शेतकरी असल्याचा दाखलासुध्दा जोडला नव्हता. याबाबत सुरेश शिरसाठ यांनी २३ व २८ ऑगस्ट रोजी दावे दाखल केले होते.

कलम ६३च्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा ठपकाया दाव्यांची गंभीर दखल घेत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मौजे चौगाव येथील शेतजमीन प्रकाश केशरलाल जैन, अनुप प्रकाश जैन हे शेतकरी नसताना त्यांनी खरेदी केल्याचे आढळून आले.

तसेच इस्माईल इसाक बागवान, हिना इस्माईल बागवान यांनीही शेतकरी असल्याबाबत बनावट दाखल्यांच्या वापर करीत वराड रस्त्यावरील शेतजमीन रु. ९.६४ पैसेप्रमाणे खरेदी केली आहे. शेतकरी नसताना शेतजमीन खरेदी केल्यामुळे कलम ६३च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे तहसीलदारांनी म्हटले आहे.

सर्व जमिनीची खरेदी रद्द करून होणार शासनजमामहाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८च्या कलम ८४ क पोटकलम (३) अन्वये क्र.२ मध्ये नमूद केलेल्या खाते क्र.१७०२ व १७०३ मधील खातेदारांची शेतजमीन याद्वारे सरकार जमा करण्यात येत असल्याचे आदेश तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिले आहेत. तसेच संबंधित व्यापाऱ्यांनी केलेली खरेदीही रद्द होणार आहे. शिरसाठ यांनी दाखल केलेल्या या दोन्ही दाव्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.

शेतकरी असल्याचा दाखला अनिवार्यशेतजमिनीची खरेदी करताना खरेदी करणाऱ्याकडे शेतकरी दाखला असणे अनिवार्य असून तो खरेदीच्यावेळी सादर करणे बंधनकारक असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

याप्रकरणात शेतजमीन खरेदी करणारे हे शेतकरी नाहीत. तसे दाखले त्यांनी जोडलेले नाहीत. त्यामुळे ही खरेदी विधी अग्राह्य करण्यात आली असून शेतजमीन शासन जमा करण्याचा निर्णय देण्यात आला आहे. यापुढे नागरिकांनी शेती खरेदी-विक्री करताना कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करून घ्यावी जेणेकरून आपली आणि शासनाची फसवणूक होणार नाही.- भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, चोपडा

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer certificate mandatory for land purchase, what is the matter?

Web Summary : Jalgaon: Traders bought agricultural land without a farmer certificate. The land will be confiscated as per the court order for violating regulations.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीजमीन खरेदीशेतकरी