नाशिक : कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषि संकल्प अभियान (Krushi Sankalp Abhiyan) - २०२५ हे राष्ट्रीय स्तरावरील अभियान २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात राबवले जात आहे.
या अभियानांतर्गत दि. १० मे २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) मालेगाव तालुक्यांतील एकूण ६ गावांमध्ये विविध विषयांवर कृषी विज्ञान केंद्र (KVK) मालेगाव राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी (पुणे), कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) आणि आत्मा नाशिक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, वातावरणातील बदलानुरूप पिकांचे नवनवीन वाण, रासायनिक खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेतीपध्दती, पिकांच्या उत्पादनवाढीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, पशुपालन, मत्स्यपालन तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणि धोरणांची माहिती पोहोचविणे हा आहे.
मालेगाव तालुक्यातील कार्यक्रम : वजीरखेडे, काष्टी, वडगाव, दाभाडी, बेळगाव आणि रावळगाव या गावांमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुवर यांनी द्राक्ष पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.तसेच डॉ.अहमद शब्बीर यांनी डाळिंब व द्राक्ष निर्यातीतील कीटकनाशक अवशेष व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.
डॉ. ए. के. उपाध्याय यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापण तसेच जमीन आरोग्यपत्रिकेच्या आधारे संतुलित खत वापरातून लागवड खर्च कसा कमी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. एस. डी. रामटेके प्रधान शास्त्रज्ञ यांनी भाजीपाला आणि फळपिकात पिकात वाढ नियंत्रकचा वापर (PGR) याबाबत मार्गदर्शन केले.
तर कृषि विज्ञान केंद्र मालेगावचे शास्त्रज्ञ रुपेश खेडकर यांनी मका पिकातील सुधारित लागवड तंत्रज्ञानबाबत मार्गदर्शन केले. विशाल चौधरी यांनी मका पिकातीत उशिराने येणाऱ्या सुकवा (मर रोग) व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. पवन चौधरी यांनी नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक शेती निविष्ठा वापर आणि नैसर्गिक शेती निविष्ठानिर्मिती पध्दती याबाबतशेतकऱ्यांशी संवाद साधला.
या सर्व कार्यक्रमांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आधुनिक ज्ञान मिळवित आहेत. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमित पाटील यांनी सांगितले की, या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शास्त्रज्ञांच्या दोन टीम्स तयार करण्यात आल्या आहेत, ज्या दररोज प्रत्येकी तीन गावांमध्ये भेट देऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करता आहेत.
संतुलित खत वापर केल्यास....
संतुलित खत वापर केल्यास लागवड खर्च कमी होऊ शकतो. खतांच्या योग्य वापरामुळे पिकांची वाढ चांगली होते, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो. तसेच, खतांचा अनावश्यक वापर टाळल्यास, खर्च कमी होतो आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम देखील कमी होतो.
- तुमच्या जमिनीचे माती परीक्षण करून घ्या, जेणेकरून तुमच्या जमिनीतील पोषक तत्वांची कमतरता आणि गरज समजेल.
- तुमच्या पिकांच्या गरजेनुसार आणि मातीतील पोषक तत्वांच्या कमतरतेनुसार खतांची निवड करा.
- खते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरा, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते.
- माती परीक्षण आणि पिकांच्या गरजेनुसार खतांची योग्य मात्रा वापरा.
- संतुलित खत वापर केल्यास, लागवड खर्च कमी होऊ शकतो आणि शेती अधिक फायदेशीर होऊ शकते.