प्रमोद शेजूळ
शेतकरी यंदा अद्रक लागवडीवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे अद्रक पिकात सड व करपा रोगाचे थैमान वाढले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. (Ginger Farming)
यंदा पिकांवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता असून उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे.(Ginger Farming)
सिल्लोड तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अद्रक पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्थानिक तसेच परराज्यात या पिकाला चांगली मागणी असते. (Ginger Farming)
मात्र, यंदाच्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. अतिपावसामुळे अद्रक पिकात सड व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.(Ginger Farming)
अद्रक उत्पादनात आघाडीवर असलेली गावे
भराडी, दिडगाव, खातखेडा, मांडगाव, पिरोळा, डोईफोडा, वडोद चाथा, वडाळा, बोजगाव, आमठाणा, धानोरा, वांजोळा, मोढा बु, मोढा खु, उपळी आणि सिसारखेडा या गावांमध्ये अद्रक पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे या भागातील पीक संकटात सापडले आहे.
उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता
अनेक शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले असून, जे थोडेफार वाचेल त्यातही उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. सलग दोन वर्षांपासून अद्रक पिकाला योग्य भाव न मिळाल्याने आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती आणखी चिंताजनक ठरत आहे. मागील वर्षी फक्त हजार ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने उत्पादन खर्चही निघाला नव्हता.
पाणी काढून टाकणे सुरू
अतिवृष्टीमुळे अद्रक शेतात पाणी साचले असून त्यासाठी चर खोदून पाणी बाहेर काढले जात आहे. तरीही कंद सड आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखणे अवघड ठरत आहे.
अद्रकमध्ये कंद मर आणि सड आढळून येत आहेत. आम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधं वापरतो आहोत. तसेच पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर मर्यादित ठेवून शेतात चर काढून पाणी बाहेर काढत आहोत. - दत्तू शिंदे, शेतकरी, खातखेडा
तज्ज्ञांचा सल्ला
* अतिपावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत तज्ज्ञांनी शेतकऱ्यांनी या उपाययोजनांचा अवलंब करावा.
* जिथे पाणी साचले आहे तेथून त्वरित निचरा करावा.
* करपा रोगाकरिता नामांकित कंपनीचे बुरशीनाशक औषध फवारावे.
* सड टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या बायोमिक्स (ट्रायकोडर्मा) या जैविक उत्पादनाची फवारणी ठिंबकने करावी.
* सड लागलेला अद्रकाचा भाग काढून टाकावा.
अद्रक पिकात पाणी साचणे टाळणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य वेळी बुरशीनाशक व जैविक उपाययोजना केल्यास नुकसान काही प्रमाणात कमी करता येईल. - प्रमोद डापके, मंडळ कृषी अधिकारी, सिल्लोड
हे ही वाचा सविस्तर : Marigold Cultivation : गणेशोत्सवात झेंडूचा बहर; शेतकऱ्यांना मिळाला चांगला फायदा