NDCC Bank : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत (Nashik Jilha Bank) निफाड तालुक्यातील 45 शेतकऱ्यांच्या जमिनीचा जाहीर लिलाव होत होता. यावेळी शेतकरी समन्वय समितीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेवटी हे लिलाव स्थगित करण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने भगवान बोराडे यांच्यासह इतर शेतकरी सभासद उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती अशी की, या शेतकऱ्यांच्या लिलावासंबंधी वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली होती. या जाहिराती नुसार व शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीसीनुसार निफाड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालयात सहकार भवन येथे लिलाव ठेवण्यात आले होते. यावेळी शेतकरी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल करत लिलावाला विरोध दर्शविला.
या लिलावास विरोध करताना नाशिक जिल्ह्यातील सक्तीची कर्ज वसुली व कारवाई संदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तीन महिन्यासाठी स्थगिती दिली असून बच्चू कडू यांच्या आंदोलनात सक्तीच्या कर्ज वसुली व कारवाईस स्थगिती देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मंत्र्यांनी आश्वासित केले आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यांनतर उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित लिलाव बंद केले.
दरम्यान ११ एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये थकबाकीदार यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांना व्याजात सवलत किंवा कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी तत्कालीन प्रशासकांनी कृषी मंत्र्याच्या सोबत बैठक घेऊन सांगतो. असे आश्वासन दिले. त्यांनतर शेतकरी समन्वय समितीच्या वतीने मशाल मोर्चाही काढण्यात आला. यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शब्द देत पुन्हा मुंबईत बैठक झाली.
त्यांनतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आश्वासन दिले. नंतरच्या काळात जिल्हा बँकेचे प्रशासक बदलले. आणि एप्रिल महिन्यात लिलाव जाहिरात देण्यात आली. त्या अनुषंगाने निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज निफाड येथे लिलाव ठेवण्यात आले होते. या लिलावाला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करत हे लिलाव हाणून पाडले.