Join us
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने ‘सीसीआय’ला दिली 1718.56 काेटींची नुकसानभरपाई, कापूस विक्रीतून ताेटा हाेताे तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:34 IST

Cotton Market : सीसीआयला एवढ्या माेठ्या प्रमाणात ताेटा हाेताे कसा, यावे स्पष्टीकरण सीसीआय अथवा केंद्रीय वस्राेद्याेग मंत्रालय देत नाही.

- सुनील चरपेनागपूर : सन २०२३-२४ च्या हंगामात देशात एकूण ३४९ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले हाेते. सीसीआयने यातील ९.४० टक्के म्हणजेच ३२.८१ लाख गाठी कापूस एमएसपी दराने खरेदी केला. 

या खरेदीत त्यांना १,७१८.५६ काेटी रुपयांचे नुकसान झाले असून, केंद्र सरकारने त्यांना हा निधी १८ मार्च २०२६ ला भरपाईपाेटी दिला आहे. या हंगामात कापसाचे दर एमएसपीच्या आसपास असूनही सीसीआयला एवढ्या माेठ्या प्रमाणात ताेटा हाेताे कसा, यावे स्पष्टीकरण सीसीआय अथवा केंद्रीय वस्राेद्याेग मंत्रालय देत नाही.

सीसीआयने ०२३-२४ च्या हंगामात देशातील १२ कापूस उत्पादक राज्यांमधील १४९ जिल्ह्यांमध्ये एकूण ४४९ खरेदी केंद्र सुरू करून प्रतिक्विंटल ७,०२० रुपये या एमएसपी दराने ३२.८१ लाख गाठी कापूस खरेदी केला. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात खुल्या बाजारातील कापसाचे दर एमएसपीच्या खाली म्हणजेच प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ६ हजार ९०० रुपये, १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२४ या काळात ६ हजार ८०० ते ७ हजार २०० तसेच १ मे ते ३० सप्टेंबर २०२४ या काळात ७,३०० ते ७,६०० रुपयांच्या दरम्यान हाेते.

या हंगामात सीसीआयने सर्वाधिक २४ लाख गाठी कापूस तेलंगणात तर सर्वात कमी ३८ हजार गाठी कापूस पंजाबमध्ये खरेदी केला. महाराष्ट्रात मात्र २.४४ लाख गाठी कापूस खरेदी केला हाेता. खुल्या बाजारातील कापसाचे दर एमएसपीपेक्षा कमी असणे, जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीज किरायाने घेणे, कापसाची संथ आवक, रुईच्या गाठी तयार करणे, कापूस व गाठींचा वाहतूक तसेच साठवणूक खर्च, या खर्चाच्या रकमेवरील व्याज, रुईच्या गाठी व सरकीची बाजारभावाप्रमाणे विक्री करणे यासह अन्य कारणांमुळे ताेटा हाेताे, असे सीसीआयने स्पष्ट केले आहे. वास्तवात, हा ताेटा कमी करण्यासाठी सीसीआयने आजवर कुठल्याही सुधारणा केल्या नाहीत.

शेतकऱ्यांचे ६,६३० कोटींंचे नुकसानदरातील चढ-उतार विचारात घेता देशातील शेतकऱ्यांनी एकूण उत्पादनाच्या ३१६.१९ लाख गाठी म्हणजेच ९०.६० टक्के कापूस मिळेल त्या दराने व्यापाऱ्यांना विकला. सीसीआयला केवळ ३२.८१ लाख गाठी कापूस खरेदीत तर १,७१८.५६ काेटी रुपयांचा ताेटा हाेताे तर शेतकऱ्यांनी किमान २६० लाख गाठी कापूस एमएसपीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे किमान ६,६३० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही नुकसानभरपाई देणार काेण?

ओलाव्याचे कारण व कमी दरऑक्टाेबर ते डिसेंबर या काळात कापसाची आवक अधिक असते. याच काळात कापसात ओलाव्याचे प्रमाण अधिक असते व सीसीआय अधिक कापूस खरेदी करते. सीसीआय दरवर्षी ओलाव्याचे कारण पुढे करून प्रति टक्का ओलाव्याप्रमाणे एमएसपी दरात १० टक्के कपात करून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करते. पण, ओलावा जर कमी असेल, तर सीसीआय शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा १० टक्के दर अधिक देत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : CCI's Loss: Government Compensates ₹1718.56 Crore, Farmers Suffer MSP Shortfall.

Web Summary : CCI faced ₹1718.56 crore loss buying cotton at MSP, compensated by the government. Farmers sold most cotton below MSP, losing ₹6,630 crore. CCI's moisture deductions further reduced farmer income. Reasons for CCI's loss are ginning, transport, and storage costs.
टॅग्स :कापूसमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती