Join us

BT Cotton : कृषी विभागाचा सल्ला : एकाच वाणाचा अति वापर टाळा, पर्याय निवडा! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:24 IST

BT Cotton : कापसाच्या पेरणीचा हंगाम सुरू, बियाण्यांची टंचाई नाही. मात्र, एका विशिष्ट वाणावर भर देणे शेतकऱ्यांसाठी ठरू शकते धोकेदायक असा कृषी विभागाने महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (BT Cotton)

BT Cotton : कापसाच्या पेरणीचा हंगाम सुरू, बियाण्यांची टंचाई नाही. मात्र, एका विशिष्ट वाणावर भर देणे शेतकऱ्यांसाठी ठरू शकते धोकेदायक असा कृषी विभागाने महत्त्वाचा सल्ला दिला आहे. (BT Cotton)

खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावती जिल्ह्यात कापसाच्या बीटी बियाण्यांची कोणतीही टंचाई नाही. १२.४७ लाख पाकिटांची गरज असताना तब्बल १३.७५ लाख बीटी बियाण्यांची पाकिटे जिल्ह्यात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी एकाच विशिष्ट वाणावर भर न देता विविध कंपन्यांचे दर्जेदार वाण स्वीकारावेत, असे स्पष्ट आवाहन कृषी विभागाने केले आहे.(BT Cotton)

कापसाच्या वाणांची निवड करताना माहितीपूर्वक निर्णय घ्या!

अलीकडच्या काळात दर्यापूर तालुक्यासह इतर भागांत एका विशिष्ट कंपनीच्या दोन वाणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाणं बीजी-२ प्रकारात मोडतात. कृषी विभागाच्या माहितीनुसार, 'बीजी-२' तंत्रज्ञान हे सर्व कंपन्यांमध्ये सारखेच असते, त्यामुळे एकाच वाणाचा आग्रह करणे अवैज्ञानिक आणि धोकादायक ठरू शकते.

बीजी-२ म्हणजे काय?

बीजी-२ हे जनुकीय सुधारित तंत्रज्ञान (Genetically Modified) असून त्यात कपाशीवरील प्रमुख किडींना (बोंड अळी व स्पोडोप्टेरा) प्रतिकार करणाऱ्या दोन BT प्रथिने असतात. ही प्रथिने बहुतेक सर्व बीटी वाणांमध्ये समान असतात.

एकाच वाणाचा अति वापर : धोके काय?

* सतत एकाच वाणाचा वापर केल्यास किडींमध्ये त्या प्रथिनांविरोधात प्रतिकारशक्ती विकसित होते, आणि त्याचा प्रभाव हळूहळू कमी होतो.

* रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि जमिनीचे आरोग्यही बिघडू शकते.

* बाजारात त्या वाणाचा अतिपूरवठा होतो, ज्याचा दरावर परिणाम होण्याची शक्यता असते.

* त्यामुळे विविध वाणांचा वापर करणे फायदेशीर आणि टिकावू शेतीसाठी आवश्यक आहे.

बियाण्यांची सद्यस्थिती (उपलब्धता)

पीकउपलब्धता
कापूस (बीटी पाकिटे)६,९३,५०० (शिल्लक)
सोयाबीन२८,२०० क्विंटल
तूर१,८३१ क्विंटल
उडीद४८ क्विंटल
मूग१६ क्विंटल
मका९०० क्विंटल
ज्वारी१९० क्विंटल

कृषी विभागाचा सल्ला

* शेतकऱ्यांनी कुठल्याही एका कंपनीच्या वाणावर विश्वास ठेवून पेरणी करू नये.

* बाजारात उपलब्ध असलेल्या प्रमाणित, शिफारस केलेल्या विविध वाणांचा अवलंब करावा.

* बोगस बियाण्यांपासून सावध राहून अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावेत.

शेतीला शाश्वत दिशा हवी, फक्त मागणीच्या आधारावर निर्णय नको!

शेती ही केवळ एक हंगामी उत्पादन प्रक्रिया नसून शाश्वत नियोजनाची गरज असलेली व्यवसायिक उपक्रम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील चर्चांपेक्षा कृषी वैज्ञानिकांचा सल्ला व कृषी विभागाच्या मार्गदर्शनावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे.

हे ही वाचा सविस्तर : Fruit Orchard Subsidy : अनुदानात कोट्यवधींचा घोटाळा : शेतात झाड नाही, तरीही मिळाले लाखो रुपये! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसशेतकरीशेतीखरीपअमरावती