Join us
Daily Top 2Weekly Top 5

Banana Farmer Crisis : उत्पादन भरपूर, भाव शून्य; केळी उत्पादक 'पश्चात्ताप'च्या खाईत वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 10:43 IST

Banana Farmer Crisis : सोयगाव तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कापसाला पर्याय म्हणून आशेने उभी केलेली केळीची बाग आता बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. (Banana Farmer Crisis)

Banana Farmer Crisis : कापूस पिकाला पर्याय म्हणून आशेने केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. उत्पादन उत्तम असूनही बाजारात मागणी नसल्याने व्यापारी गायब झाले आहेत. (Banana Farmer Crisis)

व्यापारी फक्त १००–२०० रुपये क्विंटल दर देत असल्याने लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. किरकोळ बाजारात मात्र हीच केळी ४०–५० रुपये डझन दराने विकली जात असल्याने शेतकरी आणि ग्राहक दोघांचीही लूट होत आहे. या बिकट परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी तर बागाच उखडून टाकण्याचा जड निर्णय घेतला आहे. (Banana Farmer Crisis)

कापसाला पर्याय म्हणून 'केळी'

कापसाच्या दरांनी कंटाळलेल्या सोयगाव आणि आसपासच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी केळी लागवडीकडे वळताना मोठी गुंतवणूक केली.

बेणे खरेदी, खत, औषधे, मजुरी, सिंचन या सगळ्यावर मोठा खर्च करून २–३ एकरांमध्ये हजारो खोडे लावण्यात आली. अपेक्षा होती की काढणीच्या वेळी चांगला दर मिळेल आणि सर्व खर्च भरून निघेल. मात्र, बाजारात केळीचे भाव कोसळल्याने त्यांची मेहनत वाया गेली आहे.

व्यापारी गायब 

काढणीला आलेल्या केळीच्या बागांवर व्यापारी पूर्णपणे गायब झाले आहेत.

फक्त २०० रुपये क्विंटल दराने खरेदी करणारे व्यापारीही आता मागे हटत आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, दिवसभर मागे फिरूनही व्यापारी फोन उचलत नाहीत. माल पाहूनही खरेदी टाळतात. यामुळे शेतात पिकलेली केळी खराब होण्याची वेळ आली आहे.

किरकोळ बाजारात मात्र प्रचंड दर

ठोक बाजारात शेतकऱ्यांकडून २०० रुपयांना क्विंटल खरेदी होणारी केळी शहरातील बाजारात ४० ते ५० रुपये डझनने विकली जात आहे.

खऱ्या गणनेनुसार किरकोळ दर 

४० रुपये/डझन  म्हणजेच ३,३३३ प्रति क्विंटल

५० रुपये/डझन  म्हणजेच ४,१६७ प्रति क्विंटल

म्हणजे ठोक बाजारात २०० आणि किरकोळ बाजारात ३,०००–४,०००!

व्यापारी ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही लुटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हातातले पिक वाया जाऊ नये म्हणून बागा उखडून टाकल्या

दर कोसळल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी जेसीबीने बागाच उखडून टाकण्याचा निर्णय घेतला.

दोन एकरमध्ये तीन हजार खोड लावली. लाखो रुपये खर्च झाले. केळी तयार झाली तेव्हा व्यापारी १००-२०० रुपयांपेक्षा जास्त दर देत नव्हते. शेवटी बाग शेतातच पिकली आणि वाया गेली. पुन्हा नुकसान होऊ नये म्हणून जेसीबीने उपटून फेकली. - वासुदेव चौधरी, शेतकरी

....पण भाव शून्याच्या आसपास!

यंदा हवामान पोषक असल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. पण मागणी घटल्याने व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक तांत्रिक तूट निर्माण केल्याचे शेतकऱ्यांचे आरोप आहेत. व्यापाऱ्यांच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांना तयार पिकासाठी मातीमोल भाव मिळत असून नुकसान भरून निघणे अशक्य झाले आहे.

शेतकरी संतप्त

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने केळीच्या किमान आधारभावाबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. किंमत नियंत्रण नसल्याने शेतकरी तोट्यात जात आहेत तर ग्राहक महागाईत खरेदी करत आहेत. व्यापारी मात्र नफ्यात राहतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची मागणी काय?

किमान आधारभाव जाहीर करावा

खरेदी व्यवस्थेवर नियंत्रण ठेवावे

व्यापाऱ्यांचे एकाधिकारशाही थांबवावी

शेतकऱ्यांचा माल खराब होण्यापूर्वी खरेदी यंत्रणा उभी करावी

शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात

उत्पादन चांगले असूनही बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. कष्टाची शेती मोडकळीस येत असून पुढील हंगामात शेतकरी अशा पिकांकडे वळण्यास धजावणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : हरुण शेख यांची प्रगत शेती चमकली; आष्टीची केळी थेट इराणमध्ये वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Banana farmers in despair; uprooted entire orchards due to low prices.

Web Summary : Soygaon banana farmers face ruin as prices crash to ₹200/quintal. Traders profit by selling at ₹40-50/dozen. Distressed, farmers uproot crops, citing exploitation and lack of government support.
टॅग्स :शेती क्षेत्रकेळीबाजारशेतकरीशेती