सोमनाथ खताळ
दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलनाम घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालतात. यावर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' (Healthcare in Wari) या उपक्रमातून राज्य शासनाने वैद्यकीय सेवेचे भक्कम जाळे उभे केले आहे. (Ashadhi wari)
प्रत्येक ५ किमीवर दवाखाना, रुग्णवाहिका, आयसीयू, आणि १ हजार १५५ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेना विठ्ठलभक्तांची काळजी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. (Ashadhi wari)
राज्यातील विविध भागांतून 'विठू माऊली'च्या दर्शनासाठी निघालेल्या सुमारे १२ लाख ३४ हजार वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' (Healthcare in Wari) उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाने व्यापक आराखडा तयार केला आहे. सलग तिसऱ्या वर्षी राबवला जाणारा हा उपक्रम यंदा अधिक प्रभावी आणि सुसज्ज स्वरूपात पुढे आला आहे. (Ashadhi wari)
प्रत्येक ५ किलोमीटरवर 'आपला दवाखाना'
वारकऱ्यांना मार्गात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी २०३ 'आपला दवाखाना' तयार करण्यात आले आहेत. ही दवाखान्यांची रचना दर पाच किलोमीटर अंतरावर केली असून तिथे वैद्यकीय सेवा तत्पर असतील. याशिवाय, ४६ ठिकाणी १० खाटांचे तात्पुरते आयसीयू कक्ष उभारण्यात आले आहेत, जे अत्यवस्थ रुग्णांवर तत्काळ उपचार करतील.(Healthcare in Wari)
खासगी रुग्णालयांतही १० खाटा राखीव
फक्त शासकीय व्यवस्था नव्हे तर खासगी रुग्णालयांनाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सहभागी करून घेण्यात आले आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयात १० खाटा आरक्षित ठेवण्याचे आदेश पुणे उपसंचालकांनी दिले आहेत.
सुमारे १ हजार १५५ कर्मचारी कार्यरत
वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. एकूण १ हजार १५५ कर्मचाऱ्यांमध्ये १६१ तज्ज्ञ डॉक्टर, २८६ सर्वसाधारण डॉक्टर, तसेच नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, फार्मासिस्ट आणि इतर वैद्यकीय स्टाफचा समावेश आहे. २९० आरोग्यदूत दिंड्यांसोबत चालणार असून ते तातडीच्या उपचारासाठी तयार राहतील.
ठळक बाबी कोणत्या?
घटक | संख्या |
---|---|
आपला दवाखाना | २०३ |
आयसीयू केंद्र | ४६ |
रुग्णवाहिका | ३३१ |
आरोग्यदूत | २९० |
औषधी किट वितरीत | ३५०० |
स्त्रीरोगतज्ज्ञ | १५ |
हिरकणी कक्ष | ३७ |
मागील वर्षीचा अनुभव काय सांगतो?
२०२४ मध्ये जवळपास १५.१२ लाख वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले.
* ५ हजार ४६७ जणांना ॲडमिट करावे लागले
* ४ हजार ९५० जणांना मोठ्या रुग्णालयात रेफर केले
* ६६ जणांना हृदयविकाराचा झटका
* ४२६ जणांना कुत्रा चावला,
* ११ जणांना सर्पदंश,
* अतिसार, जुलाब, ताप, सर्दी-खोकला यांसारख्या आजारांनी हजारो वारकरी बाधित झाले होते.
पुढची बैठक
१२ जून रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आढावा बैठक होणार आहे, ज्यात अंतिम तयारीची तपासणी केली जाणार आहे.
पालखी सोहळ्याचे नियोजन झाले आहे. वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत, त्यांना आरोग्यसेवा तत्पर मिळावी, यासाठीच 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम हाती घेतला आहे. - डॉ. आर. बी. पवार, उपसंचालक, पुणे