Agriculture News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिंगणा येथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्रांतर्गत (सीआयपी) दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र (सीएसएआरसी) स्थापन करण्याच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश म्हणजे अन्न व पोषण सुरक्षेत वाढ करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे हा आहे.यासाठी बटाटा व रताळ्याची उत्पादनक्षमता, प्रक्रिया व्यवस्थापन व मूल्यवर्धन सुधारण्यात येणार आहे.
भारतामध्ये बटाटा क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, वाहतूक, विपणन व मूल्यसाखळी या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. या क्षेत्रातील अमाप संधींचा उपयोग करण्यासाठी आग्रा येथे हे प्रादेशिक केंद्र स्थापन केले जात आहे.
सीएसएआरसीद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या उच्च उत्पादकतेच्या, पोषणमूल्य व हवामान सहनशील बटाटा आणि रताळ्याची वाणे केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियात या क्षेत्राच्या शाश्वत विकासाला गती देतील. या केंद्राद्वारे जागतिक दर्जाचे संशोधन व नवप्रवर्तन यांना चालना दिली जाईल.