Join us

Agriculture News : खरीप हंगामातील पिकांची नजर अंदाज पैसेवारी ६४ पैसे, सवलती मिळतील का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 20:38 IST

Agriculture News : शासनाने नजर अंदाज पैसेवारीच्या अहवालात काही गावातील पैसेवारी ६० पेक्षा अधिक दर्शवली आहे.

Agriculture News : एकीकडे राज्यातील काही भागात जोरदार पावसामुळे (Heavy Rain) मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. यात शासनाने नजर अंदाज पैसेवारीच्या अहवालात काही गावातील पैसेवारी ६० पेक्षा अधिक दर्शवली आहे. म्हणजेच येथील पिकांची स्थिती चांगली असल्याचे अधोरेखित करण्यात आले. मात्र येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता ही नजर अंदाज पैसेवारी म्हणजे काय? हे समजून घेऊया.... 

धान्याच्या उत्पादनाशी निगडीत, ही शेतीमधील विशिष्ट पिकांचे उत्पन्न काढण्याची सरकारी पद्धत आहे ही नजर अनुमानाने काढण्यात येते. यासाठी, प्रत्येक गावात, प्रत्येक पिकांसाठी सुमारे १२ भूखंड निवडल्या जातात. पिक पैसेवारीत बदल झाल्यास हंगामी(तात्पुरती) पैसेवारी जाहीर करण्यात येते. गावांचे शिवारात, एकूण पेरलेल्या वा लागवडीखालील एकूण क्षेत्रफळाचे ८० टक्केपर्यंतची सर्व पिके ही पैसेवारी काढण्यास मान्य करण्यात येतात. शासनाचा महसुल विभाग प्रत्येक गावातील कोरडवाहु,खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढीत असतो. यालाच पूर्वी आणेवारी असा शब्द प्रचलित होता.

तर यंदा वाशीम जिल्ह्यात (Washim District) यावर्षी सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस पडला. वारंवार अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसानही झाले. खरीप हंगामातील ७९३ गावांची पैसेवारी ६४ पैसे आली आहे. अशातच प्रशासनाने यंदाच्या खरीप पिकांची ७९३ गावांतील नजर अंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर केली असून, पैसेवारी ६४ पैसे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तमच असल्याचे अधोरेखित होत आहे. आता सुधारीत पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यामध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असेल, तरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.      

आता अंतिम पैसेवारीकडे असेल लक्ष खरीप पिकांची पैसेवारी तीन वेळा जाहीर केली जाते. सुरुवातीला ३० सप्टेंबर रोजी नजर अंदाज, ३१ ऑक्टोबरला सुधारित आणि डिसेंबरमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. अंतिम पैसेवारीत ज्या गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी येते, त्या गावांत दुष्काळी सवलती जाहीर केल्या जातात. त्यामुळे आता अंतीम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे.

सोयाबीनचे प्रचंड नुकसान यावर्षी जिल्ह्यात जुलैपासून वारंवार अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाल्याने केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. प्रामुख्याने जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात सप्टेंबरच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाचा फटका बसल्याने ४० हजार हेक्टरवर पीक नुकसानाचा प्राथमिक अंदाजही आहे. मालेगाव आणि वाशिम तालुक्याला जोरदार पावसाचा फटका बसल्याने ४० हजार हेक्टरवरील प्राथमिक नुकसानीचा अंदाज आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीखरीपपाऊस