जळगाव : विविध संकटांशी सामना करीत शेती करणे सध्या अवघड झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खूपच बिघडली आहे. अशाच जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) पळासखेडे येथील एका शेतकऱ्याला बी-बियाणे खरेदीसाठी आपला बैल विकण्याची वेळ आली.
खरीप हंगामाला (Kharif Season) सुरुवात झाली असून पेरण्यांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे खरीप हंगामाची पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळासखेडे येथील रमेश महादू इमाने या शेतकऱ्याला बैल विकावा लागला आहे.
या शेतकऱ्याने पेरणीसाठी बियाणे खरेदी (Biyane Kharedi) करावयाचे होते. मात्र आर्थिक चणचण असल्याने नेमकं काय करावे हे सुचत नव्हते. अशावेळी काळजावर दगड ठेवून त्यांना आपला जिवाभावाचा बैल ४० हजार रुपयांत विकावा लागला. पेरणी करण्यासाठी बियाणे खरेदी करण्यासाठीही पैसे नसल्याने नाइलाजाने हा निर्णय त्यांना घ्यावा लागला.
बैल हा प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचा सखा, सोबतीच असतो. एक भावनिक नाते आपल्या बैलासोबत शेतकऱ्याचे असते. असाच अनेक वर्ष सांभाळून ठेवलेला बैल विकताना रमेश इमाने यांचे डोळे पाणावले होते.
गेल्या तीन वर्षापासून अवेळी पडणारा पाऊस, खत, बी बियाणे, कीटकनाशके यांचे वाढत चाललेले आणि उत्पन्नाला भाव नसल्याचा फटका पाहता शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. ही बाब पाहता गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावी तसेच शेतमालाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी इमाने यांनी केली आहे.