Agricultural Literacy : पिकांवरील वाढते रोग, त्यावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली असंख्य कीटकनाशके, बुरशीनाशके व औषधे आणि याच औषधांच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक लुबाडणूक, हे सध्याचे ग्रामीण वास्तव बनले आहे. (Agricultural Literacy)
आज राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या पार्श्वभूमीवर पाहता, शेतीविषयक अनभिज्ञता ही केवळ उत्पादन घटण्यापुरती मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या आर्थिक अस्तित्वालाच धोका निर्माण करणारी गंभीर समस्या ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. (Agricultural Literacy)
पिकाला नेमका कोणता रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यावर कोणते औषध प्रभावी ठरेल, त्यामधील सक्रिय घटक कोणते आहेत आणि त्याचे प्रमाण किती असावे, याची पुरेशी माहिती नसल्याचा गैरफायदा काही औषध विक्रेते घेत असल्याचे चित्र अनेक भागांत पाहायला मिळत आहे. (Agricultural Literacy)
कपाशीवरील लाल्या व तुडतुडे, सोयाबीनवरील अळी व बुरशीजन्य रोग, तसेच फळबागांमधील विविध रोगांवर उपाय शोधताना शेतकरी थेट कृषी सेवा केंद्रे किंवा दुकानांकडे धाव घेतात. (Agricultural Literacy)
मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा गरज नसलेली, महागडी आणि एकाच वेळी अनेक औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
अवाजवी फवारणीचा दुष्परिणाम
एकाच वेळी अनेक औषधे मिसळून फवारणी केल्याने तात्पुरता परिणाम दिसत असला, तरी दीर्घकाळात याचा पिकांवर आणि जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
अवाजवी व चुकीच्या फवारणीमुळे जमिनीचा पोत बिघडतो, मित्र किडी नष्ट होतात आणि उत्पादन खर्च वाढतो. परिणामी अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आणि शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकतो.
कृषी साक्षरता अनिवार्य
आजच्या काळात केवळ मेहनत करून शेती नफ्यात आणणे शक्य नाही; त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी साक्षर होणे अत्यावश्यक बनले आहे.
औषधांच्या फक्त ब्रँड नावांवर विसंबून न राहता, त्यामधील तांत्रिक घटक, कार्यक्षमता आणि वापराची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे.
औषधांच्या बाटलीवरील हिरवा, निळा, पिवळा आणि लाल त्रिकोण हे विषारीपणाचे निर्देशक काय दर्शवतात, याची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला असणे आवश्यक आहे.
कृषी विभागाची जबाबदारी वाढली
शेतकऱ्यांची होत असलेली लुबाडणूक थांबवण्यासाठी कृषी विभागाने अधिक सक्रिय भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
प्रत्येक गावात कृषी सहाय्यक व विस्तार अधिकारी यांनी थेट शेतावर भेट देऊन किडींची ओळख, मित्र व शत्रू किडीमधील फरक, तसेच योग्य औषधांची शिफारस केल्यास औषधांवरील अनावश्यक खर्च ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
* पिकावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास कृषी विभागाच्या ‘क्रॉप सॅप’सारख्या अधिकृत अॅपचा वापर करावा.
* औषध खरेदी करताना अधिकृत कृषी सेवा केंद्राकडून पक्के बिल घ्यावे.
* कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाने शिफारस केलेलीच औषधे वापरण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
* राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने केवळ योजनांची घोषणा नव्हे, तर शेती साक्षरतेच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज असल्याचे या परिस्थितीतून अधोरेखित होत आहे.
* शेतकरी साक्षर झाला, तरच त्याची लूट थांबेल आणि शेती खऱ्या अर्थाने शाश्वत बनेल, असा सूर सर्वत्र उमटत आहे.
Web Summary : Farmers face exploitation due to a lack of agricultural knowledge. They are often sold unnecessary and expensive pesticides. Agricultural literacy is crucial for sustainable farming and preventing financial loss, emphasizing informed decision-making and responsible pesticide use.
Web Summary : किसानों को कृषि ज्ञान की कमी के कारण शोषण का सामना करना पड़ता है। उन्हें अक्सर अनावश्यक और महंगे कीटनाशक बेचे जाते हैं। स्थायी खेती और वित्तीय नुकसान को रोकने के लिए कृषि साक्षरता महत्वपूर्ण है, जो सूचित निर्णय लेने और जिम्मेदार कीटनाशक उपयोग पर जोर देती है।