Nilanga (Latur) : तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने मृग नक्षत्रात सोयाबीनची पेरणी केली. मात्र, काही शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येत आहे. येथील एका शेतकऱ्याने नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते. दहा दिवस उलटूनही बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्याने कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्याने तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकरी श्रीहरी राजाराम खोमणे यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या निलंगा येथील चार एकर शेतीत एका नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते. दहा दिवसानंतरही बियाणे न उगवल्याने त्यांनी कृषी सेवा केंद्रचालकाला कळविले. त्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे बोट दाखविले. कृषी कार्यालयात तक्रार केली आहे.
दुबार पेरणीचे संकट...माझ्या तक्रारीनुसार पंचनामा होऊन अहवाल येईपर्यंत खूप विलंब होणार आहे. बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागणार असून त्याचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तरी याची तातडीने दखल घेऊन मला न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी श्रीहरी खोमणे यांनी केली आहे.
बियाणात दोष असल्यास कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेल. मात्र, त्यासाठी याच बॅच नंबरचे बियाणे इतर ठिकाणीही उगवले नसल्याचे तपासावे लागेल. तालुका तक्रार निवारण केंद्राकडून आणि तज्ज्ञांमार्फत पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल. यात कंपनी दोषी आढळल्यास भरपाई मिळेल.- नाथराव शिंदे, तालुका कृषी अधिकारी.