Join us
Daily Top 2Weekly Top 5

'एफएसएसएआय'लॅबमुळे कोकणाला दिलासा; स्थानिक स्तरावर होणार तपासणी, प्रमाणन सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:43 IST

जयगड बंदर येथे उभारण्यात आलेल्या एफ.एस.एस.ए.आय (FSSAI) लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असून प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवे दालन खुले होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र सागरी मंडळाचे संचालक परशुराम पाटील यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या जयगड बंदर येथे उभारण्यात आलेल्या प्लांट क्वारंटाईन कार्यालय आणि एनएबीएल मान्यताप्राप्त एफ.एस.एस.ए.आय (FSSAI) लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असून प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवे दालन खुले होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र सागरी मंडळाचे संचालक परशुराम पाटील यांनी केले.

महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि काजू बोर्ड यांच्या संयुक्त प्रयत्नांतून जेएसडब्ल्यू जयगड बंदर येथील प्लांट क्वारंटाईन कार्यालय आणि एफ.एस.एस.ए.आय लॅबचे उद्घाटन महाराष्ट्र सागरी मंडळाचे संचालक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र सागरी मंडळाचे कॅप्टन संजय उगलमुगले, प्लांट क्वारंटाईन अधिकारी सुनील पाटील, डॉ. स्वामी, एनएबीएल लॅब प्रतिनिधी गांधी, मिथिलेश देसाई, शेतकरी, निर्यातदारांचे प्रतिनिधी आणि जयगड पोर्टचे  अधिकारी उपस्थित होते.

नवीन प्लांट क्वारंटाईन व एफ.एस.एस.ए.आय लॅब सुरू झाल्यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, मच्छीमार तसेच काजू व आंबा निर्यातदारांना स्थानिक स्तरावर तपासणी व प्रमाणन सुविधा उपलब्ध झाली असून अतिरिक्त वेळ, इंधन व वाहतूक खर्च कमी होणार आहे. कोकणातील हापूस, काजू, फणस, नारळ, कोकम, मसाले तसेच मत्स्य उत्पादनांसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो.

मात्र निर्यात प्रामुख्याने मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) सुमारे ३५० कि.मी. अंतरावर अवलंबून असल्याने प्रति कंटेनर सुमारे साठ हजारापर्यंत वाहतूक खर्च तसेच किमान दोन दिवस अतिरिक्त वेळ, त्यामुळे ताजेपणावर परिणाम होतो व हंगामात मोठी गर्दी व जोखीम अशा अडचणी निर्माण होत होत्या.

या उपक्रमाला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांचे पाठबळ मिळाले.

कृषी निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता

जयगड बंदर भौगोलिक स्थान, सर्व हंगामात कार्यरत खोल पाण्याची क्षमता, विद्यमान वेअरहाऊस व कोल्ड स्टोरेज सुविधा आणि कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर व उत्तर कर्नाटक या प्रदेशाशी असलेला संपर्क यामुळे ते कृषी-निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची क्षमता आहे.

हेही वाचा : शेतं संपून गेली तर माणसं काय खातील? गावोगावी शेतांची भासतेय कमतरता, घरांची मात्र पडतेय भर

English
हिंदी सारांश
Web Title : FSSAI Lab Boosts Konkan: Local Testing & Certification Now Available

Web Summary : Konkan's farmers, fishermen, and exporters get a boost with the new FSSAI lab at Jaigad port. It offers local testing and certification, reducing time, costs, and risks associated with exports via Mumbai. Jaigad port has the potential to become a key agricultural export hub.
टॅग्स :रत्नागिरीअन्नशेती क्षेत्रसरकारशेतीबाजार