रत्नागिरी: कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे. संयुक्त खतांच्या ५० किलोच्या पोत्यामागे २४० ते २५५ रुपयांची वाढ झाली आहे.
दि. १ जानेवारीपासून दरवाढ लागू केली जाणार असल्याचे कंपन्यांनी जाहीर केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
डीएपी व विविध संयुक्त खते तयार करण्यासाठी लागणारे फॉस्फेट रॉक, फॉस्फरिक अॅसिड, अमोनिया, नायट्रोजन, पोटॅश, सल्फर, झिंक या मूलभूत घटकांची आवश्यकता भासते.
या घटकांची आयात परदेशातून केली जाते. जागतिक बाजारात कच्च्या मालाचे तर वाढल्यामुळे खतांच्या किमतीत वाढ झाली आहे.
परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शासनाने खतांवरील अनुदानाची रक्कम वाढविणे गरजेचे आहे.
कोणत्या खताची किंमत कितीने वाढणार?
खताचे नाव | सध्याचे दर | वाढीव दर |
डीएपी | १,३५० | १,५९० |
टीएसपी | १,३०० | १,३५० |
१०:२६:२६ | १,४७० | १,७२५ |
शेणखतालाही भरमसाठ भाव!शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. शेतकऱ्यांकडून शेणखतासाठी असलेली वाढती मागणी यामुळे दरामध्ये कमालीची वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगरजिल्ह्यात खरीप हंगामातील पिकाचे क्षेत्र ८० हजार हेक्टर तर बागायती क्षेत्र दीड लाख हेक्टर आहे. रब्बीचे क्षेत्र अवघे १० हजार हेक्टर आहे. प्रतिकूल हवामानामुळे पिकाच्या उत्पादकता खालावत असताना खत व्यवस्थापन ते पीक काढणीपर्यंत येणारा खर्च अधिक असल्यामुळे खतांच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाहीत.
जमिनीत सेंद्रिय घटक कसे रुजवणार?माती परीक्षणानंतर जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. शिफारसीनुसार पिकाला समतोल व योग्य प्रमाणात खतांची मात्रा दिल्याने अन्नद्रव्याचा समतोल टिकून राहतो. क्षारयुक्त्त जमीन असल्यास सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात
खतांचा भाव दरवर्षी का वाढतोय?उत्पादकता वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले जाते तर दुसरीकडे दरवर्षी दरात वाढ केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
पालापाचोळा जाळू नकापेरणीपूर्वी पूर्व मशागत म्हणून शेतात पालापाचोळा जाळल्यामुळे जमिनीतील उपयुक्त घटक नष्ट होतात, धुरामुळे प्रदूषण होत असल्याचे सांगण्यात येते.
कंपन्या म्हणतात, १ तारखेपासून दरवाढ■ खत कंपन्यांनी दि. १ जानेवारीपासून दरवाढीची घोषणा केली आहे.■ विक्रेत्यांनी अद्याप नवीन दर आले नसल्याचे सांगत विक्रीवर परिणाम होणार असल्याचे सांगितले.■ दरवाढीमुळे शेतकरी संकटात आले असून खतांवरील सबसिडी वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
खत निर्मिती कंपन्यांनी कच्च्या मालाचे दर वाढल्याने खतांच्या किमतीतील दरवाढ जाहीर केली आहे दरवर्षी कंपन्यांकडून दरवाढ करण्यात येत आहे. शासनाकडून दरवाढीवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकता धोक्यात येत असल्याने दरवाढ थांबवणे गरजेचे आहे. - सुरेश चव्हाण
अधिक वाचा: Sendriya Carbon : मातीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? व तो कसा वाढवावा; सविस्तर पाहूया