Join us

Crop Insurance : रब्बी हंगामातील पिकांची १७० कोटींची विमा नुकसानभरपाई कंपन्यांकडे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 18:38 IST

Crop Insurance Latest Updates : कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार राज्यातील रब्बी हंगामातील एकूण विमा संरक्षित रक्कमेच्या ५० टक्क्याहून अधिक रक्कम प्रलंबित आहे.

Crop Insurance Latest Updates : खरिपातील पेरण्या पूर्ण झाल्या आणि पिकांचे व्यवस्थापन सुरू झाले तरीही मागच्या रब्बी हंगामातील पीकविम्याची भरपाई अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही अशी माहिती समोर आली आहे. कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार राज्यातील रब्बी हंगामातील एकूण विमा संरक्षित रक्कमेच्या ५० टक्क्याहून अधिक रक्कम प्रलंबित आहे. रब्बी हंगामात पिकांच्या नुकसानीची ज्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसताना दिसत आहे. 

दरम्यान, राज्यात खरिप हंगामात एक रूपयांत पीक विमा योजना सरकारने लागू केली होती. तिच योजना रब्बी हंगामासाठीही लागू करण्यात आली होती. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात पिकांचे नुकसान तुलनेने कमी होते. त्यामुळे रब्बी हंगामात पीक नुकसानीची प्रलंबित रक्कम खरिप हंगामाच्या तुलनेत कमी आहे. राज्य सरकारने राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी ९ विमा कंपन्यांना मान्यता दिली होती. त्यातील प्रत्येक कंपनीकडे कोट्यावधी रूपये प्रलंबित असल्याची माहिती आहे. (Rabi Season Crop Insurance Latest Updates)

कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार, रब्बी हंगामासाठी निश्चित नुकसान भरपाई ही २९२ कोटी रूपये एवढी होती. त्यापैकी राज्यातील ९ विमा कंपन्यांनी १२२ कोटी रूपयांची पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. तर १६९ कोटी ८६ लाख रूपयांची भरपाई कंपन्यांकडे प्रलंबित आहे. त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पाश्चात अशा भरपाईचा सामावेश होतो. भारतीय कृषी विमा कंपनीकडे सर्वांत जास्त रब्बी हंगामातील विमा नुकसान भरपाई प्रलंबित आहे. 

भारतीय कृषी विमा कंपनीकडे एकूण प्रलंबित असलेल्या १६९ कोटी रूपयांपैकी ११७ कोटी रूपये प्रलंबित आहेत. त्यामुळे जवळपास एकूण प्रलंबित रक्कमनेच्या ५० टक्क्याहून अधिक रक्कम या कंपनीकडे बाकी असून त्यापाठोपाठ युनिव्हर्सल सोम्पो ज. इं. कं. लि. कडे १९.८१ कोटी आणि एचडीएफसी इर्गो ज. इं. कं. लि कडे १८ कोटी रूपयांची भरपाई बाकी आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी