Pune : यंदाच्या हंगामातील म्हणजे मृग बहार २०२५ साठी फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झाले असून शेतकऱ्यांना आता फळपीक विमा अर्ज करण्यात येणार आहेत. विमा पोर्टल www.ncip.gov.in यावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तर या योजनेत भाग घेण्याची अंतिम दिनांक ही वेगवेगळ्या फळपिकांसाठी वेगवेगळी आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
दरम्यान, फळपीक विमा योजनेत कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता या सारख्या हवामान घटक यांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. यासोबतच यंदा या योजनेत सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून अॅग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणे आवश्यक आहे.
विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक
- लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा - १४ जून
- मोसंबी ,चिकू - ३० जून
- डाळिंब - १४ जुलै
- सीताफळ - ३१ जुलै
योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी
- Agristack नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जमीन धारणा उतारा
- Geo tag फोटो
महत्त्वाचे
- ई-पीक पाहणी बंधनकारक आहे.
- ई-पीक पाहणी नोंद नसल्यास पिक विमा अर्ज रद्द होऊ शकतो .
- ई-पीक पाहणी, पिक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै - ऑगस्ट महिन्यात करू शकतात.
- अधिक माहितीसाठी नजिकच्या विमा कंपनी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा या फळपिकांचे विमा अर्ज करण्यासाठी १४ जून ही जरी अंतिम तारीख असली तरी ही मुदत वाढणार आहे. त्याचा प्रस्ताव अजून प्रलंबित असून मुदतवाढीची माहिती लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घ्यावा.- विनयकुमार आवटे कृषी संचालक , प्रक्रिया व नियोजन,पुणे