Join us

जनावरांचे उष्माघातापासून करा संरक्षण, गोठ्यात थंडावा राहण्यासाठी हे सोपे उपाय

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 16, 2024 2:00 PM

तापमानाचा पारा वाढत असून जनावरांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे.

उन्हाळ्यात राज्यातील बहुतांश भागातील तापमान चाळीशीपार जाताना दिसत असून अतिउष्ण वातावरणापासून जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्यान, राज्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत जात असताना पाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना पशुधन विकण्याची नामुष्की ओढावली आहे.

तापमानाचा पारा वाढत असून जनावरांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. अतिउष्ण वातावरणामुळे जनावरांवर ताण येऊन त्यांना पचनसंस्था, प्रजनन संस्थेवर विपरित परिणाम होत आहेत. परिणामी, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन उत्पादकता खालावत आहे.

यासाठी काय करावे?

आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). 

पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही.

जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.

गोठ्यात थंडावा वाढवण्यासाठी...

गोठ्यात स्वच्छ व ताजी खेळती हवा येईल अशी तजवीज करावी. 

गोठ्याचे छत उष्णतारोधी असावी. गोठ्याच्या छतावर पांढरा रंग किंवा कुलंट लावावे.

छतावर वाळलेल्या गवताचा किमान सहा इंचाचा थर लावला तर गोठ्यातील तापमान कमी राहण्यास मदत मिळेल.

दिवसभर उष्ण झळांपासून वाचण्यासाठी गोठ्याच्या खिडक्या, दारे किंवा उघड्या बाजूस गोणपाटाचे पडदे लावावेत. व त्यावर पाण्याचा शिडकावा देत रहावा..

शक्य असल्यास गोठ्यात कुलर किंवा स्प्रिंकलरचा वापर करावा. 

टॅग्स :तापमानहवामानदुग्धव्यवसायउष्माघात