Lumpy Skin Diseases : खरिप हंगामाच्या उंबरठ्यावर असताना बुलढाणा जिल्ह्यातील जानावारांवर लम्पी स्किन डिसीजचे गंभीर संकट ओढावलं आहे. जनावरे मोठ्या प्रमाणात बाधित होत असून, पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष आणि उपाययोजना न झाल्याने संसर्गाची भीती वाढली आहे. (Lumpy Skin Diseases)
सुमारे ६ हजार जनावरे आजारी असून, उघड्यावर त्यांचा मुक्त संचार सुरू आहे. लसीकरण, उपचार आणि सर्वेक्षण न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.(Lumpy Skin Diseases)
खरिप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना बुलढाणा जिल्ह्यातील जानावारांवर लम्पी स्किन डिसीजच्या रूपाने गंभीर संकट कोसळले आहे. खामगाव शहरासह परिसरातील गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, आजारी जनावरे उघड्यावर फिरताना दिसत आहेत. यामुळे एकीकडे पशुधन धोक्यात आले असून, दुसरीकडे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. (Lumpy Skin Diseases)
पशुसंवर्धन विभागाची निष्क्रियता
पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण, उपचार किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात कोणताही पुढाकार घेतला जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अशक्त आणि आजारी जनावरे शहरी व ग्रामीण भागांत उघड्यावर पडलेली असून, संसर्ग फैलावण्याची भीती वाढली आहे. विभागाचे अधिकारी मात्र झोपेत असल्याचा आरोप नागरिक आणि शेतकरी करत आहेत.
पाच लाखांवर पशुधन, सहा हजार जनावरे बाधित
बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ५,९५,६७६ इतके पशुधन असून, त्यापैकी सुमारे ६ हजार जनावरे लम्पी स्किन डिसीजने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून, संसर्गाचा वेग लक्षात घेता तातडीने उपाययोजना न केल्यास स्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
शेतकऱ्यांमध्ये भीती आणि आर्थिक संकट
संक्रमित जनावरे बाजारात विक्रीसाठी घेऊन गेले तरी त्यांना योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट आले आहे. एकीकडे पीक उत्पादनासाठी खर्च, दुसरीकडे महागाई आणि त्यात जनावरांच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक कंबरड्यावर झाला आहे.
वेळेत लक्ष न दिल्यास हा संसर्ग आणखी फैलावू शकतो. पशुसंवर्धन विभागाने तत्काळ हालचाली कराव्यात. - निळकंठ सावरकर, शेतकरी, खामगाव
तातडीने सर्वेक्षणाची गरज
शेतकरी संघटनांकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तातडीने सर्वेक्षण करून लम्पी बाधित जनावरांची नोंद घेण्याची मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर लसीकरण मोहीम हाती घेऊन रुग्ण जनावरांचे उपचार सुरू करावेत, औषधसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी केली जात आहे.
प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईची गरज
लम्पीसह इतर संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. खरीपाच्या सुरुवातीला अशा आजारांमुळे पशुधनाचे नुकसान टाळायचे असेल, तर वेळीच उपाययोजना करणे अपरिहार्य आहे.