Goat Farming : शेळ्यांना पावसाळ्याअगोदर व पावसाळ्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वेळापत्रकानुसार लाळ्या खुरकूत, आंत्रविषार, घटसर्प व पीपीआर या रोगांच्या प्रतिबंधक लसी देऊन घेणे आवश्यक आहे. याच बरोबर आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते समजून घेऊयात.....
शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन
- मे व सप्टेंबर महिन्यात शेळ्यांना त्यांच्या वजनानुसार जंतनाशकाची योग्य मात्रा देऊन जंत निर्मूलन करून घ्यावे.
- ढगाळ व दमट हवामान जंतांच्या वाढीसाठी पोषक असते.
- शेळ्यांना लस कधीही रोग आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट रोगाच्या साथीमध्ये रोग झालेल्या शेळीला लस दिल्यास तो रोग बरा न होता बळावतो.
- पावसाळ्यामध्ये जखमांवर माश्या बसून त्या चिघळणार नाही, याची काळजी घ्यावी.
- माश्यांचा आवश्यक तो बंदोबस्त करावा.
- यासाठी कडुनिंब, निरगुडी किंवा करंज पाला यांचा वापर करून शेडचे निर्जंतुकीकरण करावे.
- पावसाळ्यात शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होऊन त्या चिघळू शकतात.
- यासाठी अशा शेळ्यांना वाळलेल्या जागेत ठेवून त्या जखमी पोटॅशियम परमँगनेटने धुऊन त्यावर मलमपट्टी करावी.
- पावसाळ्यात शेळ्यांच्या शेडच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा.
- तसेच शेडमधील जमिनीवरही चुना भुरभुरल्यास शेळ्यांना बाहेरून येणाऱ्या रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होईल.
- पावसाळ्यात नवीन शेळ्या शक्यतो विकत घेऊ नये. घेतल्यास कमीत कमी २१ दिवस त्या शेळ्यांना काहीही रोग नाही, यांची खात्री केल्याशिवाय त्यांना मुख्य कळपात मिसळू नये.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी