रऊफ शेख
मराठवाड्यातील सर्वांत मोठा आणि ऐतिहासिक वडोद आठवडी जनावरांचा बाजार आज आर्थिक संकटात सापडला आहे. एकेकाळी दर सोमवारी ३ ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या बाजाराची उलाढाल आता केवळ ३० लाखांवर घसरली आहे. कारण जनावरांची खरेदी-विक्री बंद करण्याचा कुरेशी समाजाचा निर्णय आणि सतत होणारे हल्ले. (Animal Market)
वाहतूक थांबली, व्यापाऱ्यांचा पाय मागे
पूर्वी वडोद बाजारात मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातून दीड हजार बैल, २०० गायी आणि तब्बल ३ हजार शेळ्या-बोकडांची खरेदी-विक्री होत असे. मात्र, अलीकडच्या काळात जनावरांची वाहतूक करताना मारहाण, वाहन अडवणे, पोलिसांकडून गुन्हे दाखल होणे, लाखो रुपये खर्च करून विकत घेतलेली जनावरे जप्त होणे या घटनांनी व्यापाऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला. परिणामी त्यांनी या व्यवहारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.
गाय-बैलांची संख्या कोसळली
मागील दीड महिन्यांपासून बाजारात बैलांची संख्या १,५०० वरून फक्त १०० पर्यंत आली आहे. गायींची संख्या केवळ २०० इतकीच राहिली आहे. विक्रीसाठी गोवंश मिळत नसल्याने बाजारात फक्त ३० लाख रुपयांची उलाढाल होत आहे.
ग्रामपंचायतीचा महसूल आणि रोजगारावर फटका
वडोद बाजाराच्या जनावरांच्या व्यवहारातून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा महसूल मिळत असे. मात्र, उलाढाल कोसळल्याने महसुलात कमालीची घट झाली असून गावाच्या विकासकामांवर याचा थेट परिणाम होत आहे. दरम्यान, मांस आणि चामड्याचे दर दुपटीने वाढले आहेत. या व्यवसायाशी संबंधित दुकानदार, मजूर यांचा रोजगार धोक्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : ४,५०० वर अडकलेले भाव आता वाढले; काय आहे कारण वाचा सविस्तर